रजनीकांत यांच्या RMM पक्षाची समाप्ती;राजकारणाला कायमचा रामराम

Update: 2021-07-13 08:12 GMT

सुपरस्टार रजनीकांत यांनी सिनेसृष्ठी प्रमाणे राजकारणात देखील आपला एक वेळा ठसा उमटविला. विधानसभा निवडणूक पुर्व आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेत त्यांनी रजनी मक्कल मंद्रम (RMM) पक्षाची स्थापना केली होती. परंतु आता रजनीकांत आपल्या राजकीय पक्षाचे विसर्जन करत असल्याचे जाहीर केले आहे. रजनीकांत यांनी हा निर्णय जाहीर केल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

रजनीकांत यांनी रजनी मक्कल मंद्रम पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसोबत सोमवारी सकाळी बैठक घेतली. त्या बैठकीनंतर रजनीकांत यांनी हा निर्णय जाहीर केला. रजनीकांत यांनी सांगितले 'भविष्यात राजकारणात येण्याची माझी कोणतीच योजना नाही.' तसेच रजनी मक्कल मंद्रम हा पक्ष विसर्जित होईल आणि त्याचं 'रजनीकांत रासिगर नारपानी मंद्रम' किंवा 'रजनीकांत फॅन्स वेलफेअर फोरम'मध्ये रुपांतर करण्यात येईल. फोरमच्या सदस्यांसोबत बैठकीपूर्वी रजनीकांत यांनी पत्रकारांना सांगितले होते की, त्यांच्या राजकीय प्रवेशावरील अनेक प्रश्नांबाबत त्यात चर्चा केली जाईल. 'मी राजकारणात प्रवेश करावा की नाही यावर चर्चा केली जाणार आहे. देशातील करोनाचा फैलाव, त्या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी झालेल्या निवडणुका, माझ्या सिनेमांचे चित्रीकरण आणि अमेरिकेतील वैद्यकीय तपासणीमुळे मी याआधी कार्यकर्त्यांना भेटू शकलो नव्हतो', असे ते म्हणाले होते.

दरम्यान, रजनीकांत यांच्या चाहत्यांना ते राजकारणात कधी प्रवेश करतात याकडे लक्ष लागून राहिले होते. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी राजकारणात एन्ट्री करणार नसल्याची घोषणा केली होती. प्रकृतीच्या कारणास्तव आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. रजनीकांत यांनी केलेल्या घोषणेमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.

Tags:    

Similar News