एका दिवसात ८०० मशिदींवरील भोंग्यांना परवानगी, भाजपचा आरोप

Update: 2022-05-04 05:20 GMT

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात हनुमान चालीसा वाचण्याचा इशारा दिल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. त्यानंतर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा बजावून शांत राहण्याचा सल्ल दिला. पण तरीही राज ठाकरे यांनी ४ मे पासून मशिदींवर भोंगे वाजले तर तिथे हनुमान चालीसा वाचा असा आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आता राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करुन सरकारवर आरोप केला आहे.


"एका दिवसांत ८०० मशिदीवरील भोंग्यांना परवानगी देण्यात येते म्हणजे कालपर्यंत हे सगळं अनाधिकृत सुरू होतं याची कल्पना सरकारला होती. मूळात कायद्याचं पालन सर्वांनीच करणं गरजेचे आहे. कायदा हा सर्वांसाठी एकसमान आहे. मग अनाधिकृत भोंग्याविरोधात कारवाई करण्याची हिंमत महाविकास आघाडी सरकारमध्ये नाही म्हणून अशाप्रकारे विरोधकांना अडकवण्याचा कटकारस्थान करत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत अनाधिकृत भोंगे उतरवावेत असं आवाहन राज ठाकरेंनी केले. मात्र सरकार त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत आहे. त्यात हनुमान चालीसा वाजवतील म्हणून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. शरद पवारांचे चाहते आणि शिवसेनेतील राष्ट्रवादीचे प्रवक्ते संजय राऊत विनाकारण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून धार्मिक तेढ निर्माण होणारी वक्तव्य करत आहेत. राज्यात कुठेही दंगलसदृश्य परिस्थिती नाही. तरीही उगाच दंगल, तेढ, अशांतता अशी विधानं करून सरकारचं धार्मिक तेढ निर्माण करण्याचं राजकारण तर करत नाही ना अशी शंका उपस्थित होते."


असा आरोपही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.

Similar News