काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीची स्वबळा भाषा, एकनाथ खडसे यांचे मोठे विधान

Update: 2021-08-30 11:11 GMT

महाविकास आघाडी सरकारमधील कुरबुरी अधूनमधून समोर येत असतात. काँग्रेस आणि शिवसेनेच्या काही नेत्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांतर्फे कामं केली जात नसल्याच्या तक्रारीही केल्या आहेत. तर दुसरीकडे नारायण राणे यांच्यावरील कारवाईनंतर महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

"तीन पक्षांचं सरकार असल्याने कामं होतं नाहीत, पुढच्या वेळेस राष्ट्रवादीची स्वबळावर सत्ता आणा" असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले आहे. जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत एकनाथ खडसे यांनी हे वक्तव्य केले आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलवर एकमत झाले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवेल असेही खडसे यांनी स्पष्ट केले आहे, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीतही कार्यकर्त्यांनी तयार असलं पाहिजे असंही खडसें यांनी यावेळी म्हटलं आहे.

जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची तयारी आता सुरू झाली आहे. यामध्ये काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. तर शिवसेनेने मंत्री गुलाबराव पाटील हे सर्वपक्षीय पॅनलसाठी प्रयत्न करुन निवडणूक टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भूमिकामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडी उतरणार की तिन्ही पक्ष स्वबळावर लढणार याबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे.

Tags:    

Similar News