राष्ट्रवादी सायलेंट मोडवर, आता थेट विधिमंडळात लढाई

Update: 2022-06-26 07:56 GMT

राज्यातील सत्यानाट्याच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठका सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विधिमंडळाच्या लढाईचा करेक्ट कार्यक्रम करून आता आमदारांना मतदारसंघात धाडले आहे. त्यामुळे वायबी सेंटर आणि राष्ट्रवादी कार्यालयात सध्या सामसूम आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यात राजकीय वातावरण अस्थिर बनले. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाची भूमिका घेत शिवसेना विधिमंडळ पक्षाचा उभी फुट केल्याचा दावा केला जात आहे. सुरत मार्गे बंडखोर आमदार आता गुवाहाटीत असून भाजप सोबत जाण्याची मागणी या गटाची आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा शासकीय निवासस्थान सोडल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन वेळा मुख्यमंत्र्यांची दीर्घकाळ भेट घेतली. आता खरी लढाई विधिमंडळ आणि न्यायालयात होणार असल्याने महा विकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एक संघटीत राहून कायदेशीर लढाई जिंकता येईल असा विश्वास पवार यांनी दिला आहे. राष्ट्रवादीच्या खासदारांच्या आमदारांच्या आणि पक्षनेत्यांच्या बैठकीत देखील पार पडले असून आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयात सामसूम आहे.

बैठकीत मार्गदर्शन करून सर्व आमदारांना आपापल्या मतदारसंघात जाण्यासाठी सुचित करण्यात आले आहे. आता शिवसेनेच्या गटात बैठक सत्र सुरू असून मोठ्या प्रमाणात मेळावा घेऊन वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी बंडखोर आमदारांना 48 तासांची मुदत दिल्यानंतर खरे नाट्य त्यानंतर सुरू होणार आहे असे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान राज्यपाल भगतसिंग दोषारी हे कोरोना मुक्त होऊन राजभवन मधे परतले आहेत..

राज्यातील सत्तानाट्यामध्ये भाजप अप्रत्यक्ष असली तरी त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आणून पराभूत करू शकू असे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. शिवसेना आक्रमक होण्याची देखील तेच कारण सांगितले जात आहे त्याचा फायदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकासआघाडी लागू होईल असे सांगितले जात आहे.


Tags:    

Similar News