सुधीर मुनगंटीवार : बहुमत आहे की नाही समजून घ्या

शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. दरम्यान भाजपच्या बैठकांचा जोर वाढला आहे. त्यापार्श्वभुमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

Update: 2022-06-28 07:57 GMT

एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis ) यांच्या सागर निवासस्थानी बैठकांवर बैठका होत आहेत. त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांनी राज्य सरकारने दोन दिवसात 160 जीआर काढल्याने त्याची माहिती मागवली आहे. त्यामुळे राज्यपाल एक्टिव (Governor in active mode) झाल्याने सरकार कोसळणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यापार्श्वभुमीवर सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सरकारला सूचक संकेत दिला आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राज्यपालांना जेव्हा एखाद्या पक्षाकडून किंवा एखाद्या समूहाकडून, एखाद्या वर्गाकडून पत्र किंवा निवेदन दिले जाते. त्या संदर्भातली माहिती राज्य सरकारकडे मागवणे हे त्यांचे कर्तव्य असते. याचा अर्थ राज्यपालांनी सरकारच्या आदेशांवर आक्षेप घेतला असा होत नाही. तसंच ते आदेश चूक आहेत असे सांगितले असा होत नाही. (Maharashtra political Crisis)

मात्र राज्यात सरकार अस्थिर राजकीय परिस्थिती असतानाही काही लोक स्थिर मनाने आदेश काढत आहेत. तसंच तिथंही अस्थिर परिस्थितीत पैसे कमवण्याचे उद्योग करत आहेत, अशी शंका आल्याने भाजपच्या वतीने राज्यपालांना हे पत्र देण्यात आले आहे.

पुढे बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, संजय राऊत (sanjay raut) यांच्या म्हणण्यावर आताच भाष्य करण्याची वेळ आलेली नाही. कारण ज्यापद्धतीने राज्यात राजकीय अस्थिरता वाढेल त्यानुसार संजय राऊत यांचे मन चंचल आणि अस्थिर होईल, असा टोलाही सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांना लगावला.

राज्यातील जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आमच्यासाठी महाराष्ट्रातील जनता नाही तर फक्त आणि फक्त खुर्ची प्रिय असल्याची भावना महाविकास आघाडी सरकारची आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने आत्मचिंतन करावे आणि आपल्याकडे बहुमत आहे का? हे काळजीपुर्वक समजून घ्यावे, असा सल्ला सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारला दिला.

Tags:    

Similar News