लखीमपूर खेरी: राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसचं शिष्टमंडळ घेणार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट

Update: 2021-10-13 05:30 GMT

लखीमपूर खेरी घटनेमध्ये शेतकऱ्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी उडवल्यानंतर देशात संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भात भाजप नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी करत मुलावर कारवाईची मागणी विरोधी पक्ष सातत्याने करत आहे.

या संदर्भात आज काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. प्रियांका गांधी यांनी या संदर्भात उत्तरप्रदेशमध्ये जाऊन मोठा लढा दिला होता. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी लखीमपूर खेरीला भेट देऊन पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.

काँग्रेस व्यतिरिक्त शेतकऱ्यांनीही या प्रकरणानंतर भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत यामुळे मोठे राजकीय वातावरण तापलं आहे.

काय आहे प्रकरण?

3 ऑक्टोबर ला लखीमपूर-खेरी येथे, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य लखीमपूर-खेरी येथील काही प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार होते. त्यानंतर त्यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे मूळ गाव बनबीरपूरला जायचे होते. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची माहिती मिळताच शेतकरी नेते काळे झेंडे दाखवण्यासाठी अजयकुमार मिश्रा यांच्या गावात पोहोचले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी भाजप नेते अजय मिश्रा यांच्या मुलाने या शेतकऱ्यांवर गाडी चालवल्याचा आरोप केला आहे.

या अपघातात अनेक शेतकरी जखमी झाले. तर काहींचा मृत्यू झाला आहे. या घटनेने देशभरात संतापाची लाट आहे. आरोपी आशिष मिश्राला सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर अटक करण्यात आली आहे. मात्र, ज्या आरोपीचे वडील केंद्रात मंत्री आहेत अशा आरोपीवर कारवाई करताना पोलिसांवर दबाव असण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आरोपीला शिक्षा व्हावी आणि केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा म्हणून विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे.

Tags:    

Similar News