मोदी पंतप्रधानपदी बसू शकतात, मग शरद पवार का नाही? अमोल कोल्हे

Update: 2021-12-12 10:37 GMT

शरद पवाररुपी महाराष्ट्राच्या नेतृत्वाने देशाच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावली आहे, जर २६ खासदार असलेल्या गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधानपदी बसू शकते तर ४८ खासदार असलेल्या महाराष्ट्रातील व्यक्ती का पंतप्रधानपदावर बसू शकत नाही? असा सवाल करत राष्ट्रवादीचे खा. डॉ. अमोल कोल्हेंनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पवार हे शाहू महाराजांचे वैचारिक वारसदार आहेत. महिलांना लष्करात भरती, राजकारणात आरक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्याची अमंलबजावणी केली. याच महिलांना आज प्रगतीची शिखरे गाठली आहेत. त्यामुळे शरद पवार हे फुलेंचे वैचारिक वारसदार आहेत. त्यांचं मार्गदर्शन आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे. पवार हे गेली चाळीस वर्ष दिल्लीतील राजकारणाची ओळख बनून राहिले आहेत. आमच्या नेत्याला पाच लाखाचा सूट घालावा लागत नाही. हजारो रुपयांचे तैवानी मशरुम खावे लागत नाही. असंही त्यांनी मोदींना चिमटा काढत म्हटले .

बिहार, पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर त्यांचे नेते शरद पवार साहेबांना भेटायला येतात, त्यामुळे नेहमीच 'हर अर्जुन का सारथी' हे त्यांना लागू होते. ते म्हणाले, भुज भूकंपावेळी शरद पवार यांची अटल बिहारी वाजपेयी यांनी वाहवा केली होती. आता मात्र सांप्रदायिकांचे हादरे या देशाला बसत आहेत. त्या जातीयवादी टोकदार भाल्याने देश रक्त बंबाळ होत आहे. टोकाची भूमिका निर्माण होत आहे त्यामुळे शरद पवारांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. जर २६ खासदार असलेल्या गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधानपदी बसू शकते तर ४८ खासदार असलेल्या महाराष्ट्रातील व्यक्ती का पंतप्रधानपदावर बसू शकत नाही. याचा विचार करण्याची गरज आहे, असंही अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.

Tags:    

Similar News