गुजरातमध्ये भाजपा बिथरलीय ; आम्ही २७ वर्षाचा हिशोब मागणारच- अरविंद केजरीवाल

गुजरात निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. त्यातच आम आदमी पक्षाकडून वारंवार भाजपवर निशाणा साधला आहे.

Update: 2022-11-24 08:05 GMT

गुजरात निवडणूकीत प्रचार शिगेला पोहचला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यापार्श्वभुमीवर आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

अरविंद केजरीवाल म्हणाले, गेली २७ वर्षे भारतीय जनता पार्टीने गुजरातला लुटले आहे. आम्ही २७ वर्षाचा हिशोब भाजपाकडे मागत आहेत. म्हणून टीव्ही चॅनलवरील डिबेटमध्ये आम आदमी पार्टीच्या प्रवक्त्याला बोलावले जात नाही. भाजपाकडून टीव्ही चॅनलवर दबाव आणला जातो आहे. एवढंच नाही तर भाजपा आता बिथरली आहे, अशी खरमरीत टीका आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सुरत येथील प्रचारसभेत केली आहे.

पुढे बोलताना केजरीवाल म्हणाले, गुजरातमधील महागाई आणि बेरोजगारी आम्हाला संपवायची आहे, म्हणून आम्ही या निवडणुकीत उतरलो आहोत. तसेच भाजपाने गुजरातमध्ये महागाई आणि बेरोजगारी निर्माण केल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला.

मोरबी हत्याकांडातील आरोपी बाहेर खुलेआम बाहेर फिरत आहेत. याचं उत्तर भाजपाकडे आहे का? इतक्या वर्षात गुजरातमध्ये पेपरफुटी प्रकरणांचं इतकं प्रमाण वाढलं आहे की, त्या प्रत्येकाचा हिशोब आम्ही घेणार आहोत? असेही केजरीवाल म्हणाले.

गुजरातमध्ये लोकांनी आपल्याला सत्तेत बसवलं तर येत्या मार्चपासून सामान्य माणसांना विजबील भरण्याची गरज पडणार नाही. महागाईने त्रस्त झालेल्या परिवारातील १८ वर्षावरील प्रत्येक महिलेच्या खात्यावर १ हजार रुपये आणि वाढती बेरीजगारी पाहता प्रत्येक बेरोजगार युवकाच्या खात्यावर ३ हजार रुपये देण्याची घोषणा केजरीवाल यांनी या सभेत केली आहे. त्यामुळे दिल्ली, पंजाबनंतर गुजरातमध्येही केजरीवाल यांनी आश्वासनांची खैरात वाटल्याचे समोर आले आहे.

Tags:    

Similar News