"आम्हीही नको ती अंडी उबवली" मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपला चिमटा

Update: 2021-11-02 09:09 GMT

जिद्द असली तर बदल सगळीकडे घडू शकतो, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला इशारा दिला आहे. बारामतीमधील इनक्युबेशन सेंटरच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. "आपण मनातल्या मनात विचार करत होतो की राजकारणात देखील एक इन्क्युबेशन सेंटर गरजेचे असते. आम्ही पण ते २५-३० वर्ष उघडलं होते, इन्क्युबेशन सेंटर म्हणजे उबवणी केंद्र....पण आम्हीही नको ती अंडी उबवली, त्याचं पुढे काय झालं ते तुम्ही बघत आहात" अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाजपला टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारामतीमध्ये शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन केले. आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी शरद पवार आणि पवार कुटुंबीयांच्या विकासाबाबतच्या दृष्टीकोनाचे कौतुक करत भाजपालाही चिमटे काढले. "सगळे पवार कुटुंबीय मनापासून विकासाचे ध्येय बाळगून काम करत आहे, असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले. आम्हीही अनेक वर्ष पवारांचे टीकाकार होतो पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे बारामतीत जाऊन एकदा ते शरद पवारांनी काय केले आहे ते पाहा, पाठिंबा देता येत नसला, तरी त्यात विघ्न आणू नये, या कामातून जो आनंद मिळतो, तो विघ्नसंतोषी लोकांना कधीही मिळणार नाही", असा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.

Tags:    

Similar News