मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नवी खेळी, राज्यपाल नियुक्त १२ आमदार नियुक्तीचा वाद पेटणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहीलेल्या पत्रानंतर राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा वाद पेटणार असल्याची चिन्ह आहेत.

Update: 2022-09-03 05:29 GMT

ठाकरे सरकारच्या काळात राज्यपाल निर्देशित 12 आमदारांच्या नियुक्तीचा वाद पेटला होता. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून महाविकास आघाडीने पाठवलेली यादी माघारी पाठवण्याची विनंती केली. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली विनंती मान्य केली. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुध्द शिंदे-फडणवीस सरकार आमने-सामने येण्याची चिन्हे आहेत.

राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून राज्यपाल निर्देशित 12 आमदारांच्या नियुक्तीचा वाद सुरू होता. तर तात्कालिन ठाकरे सरकारने राज्यपाल निर्देशित 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी 20 नावांची यादी पाठवली होती. मात्र दोन वर्षानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावर निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहचला होता. मात्र राज्यपालांनी तांत्रिक बाबींवर बोट ठेवत नियुक्त्या केल्या नव्हत्या. परंतू आता राज्यात सत्तांतर झाले आणि 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून महाविकास आघाडीने पाठवलेली राज्यपाल निर्देशित आमदारांसाठीच्या नावांची यादी मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर राज्यपालांनीही ही विनंती मान्य केल्याचे वृत्त एबीपी या वृत्तसंस्थेने दिले आहे.

१२ आमदारांबाबत काय असणार समीकरणे

महाविकास आघाडीने पाठवलेली यादी राज्यपालांनी मागे घेतल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार नवी यादी देण्याची शक्यता आहे. त्यापैकी ४ आमदार शिंदे गटाचे तर ८ आमदार भाजपचे करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडीने पाठवलेली यादी मागे घेतल्याने राज्यात महाविकास आघाडी विरुध्द शिंदे-फडणवीस सरकार आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

Tags:    

Similar News