भाजप, NCB आणि काही गुन्हेगार मिळून मुंबईत दहशत माजवत आहेत - नवाब मलिक

Update: 2021-10-20 14:28 GMT

भाजप, एनसीबी आणि काही गुन्हेगार मिळून मुंबईत दहशत माजवत आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. "NCBचे समीर वानखेडे यांचा मोबाईल आणि व्हॉटस्ॲप चॅटची स्वतंत्रपणे चौकशी केली आणि त्यांचे फोन रेकॉर्डिंग रिलीज झाले तर सर्व केसेस बोगस असल्याचे सिद्ध होईल असे मलिक यांनी म्हटले आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी याचा वापर कसा केला जातोय याचे पुरावे पुढील आठवड्यात देणार असल्याचेही नवाब मलिक यांनी जाहीर केले.

"याआधी जेव्हा रेव्ह पार्टीजवर कारवाई झाली आहे, त्यावेळी जे संशयित सापडत होते त्यांची रक्त आणि लघवी नमुन्यासाठी घेऊन संशयितांना सोडले जायचे. नमुना पॉझिटिव्ह आला तर त्यांना अटक करून कोर्टात हजर केले जात होते. पण गेल्या वर्षभरात NCBने ज्यांच्यावर आरोप केले किंवा ज्यांना अटक केली, त्यांचे कोणतेही रक्त किंवा लघवीचे नमुने तपासणीसाठी घेतलेले नाहीत. ज्या आरोपींना ताब्यात घेतले जात आहे त्यांचे नमुने पॉझिटिव्ह येणार नसल्याने त्यांची टेस्ट केली जात नाही. फक्त व्हॉटस्ॲप चॅटच्या आधारावर त्यांना आरोपी ठरवले जात आहे. केसेस खोट्या असल्यानेच नमुने घेतले जात नाहीत" असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

Tags:    

Similar News