प्रितम मुंडे : कोरोना काळात ठाकरे सरकारचे चांगले काम

Update: 2022-04-18 08:29 GMT

कोरोना काळात राज्य सरकारमुळे सामान्यांचे हाल झाले, अनेक अडचणींचा सामना करावा लागला, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करत असतात. पण आता फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजप नेत्यांना त्यांच्या पक्षाच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी घरचा आहेर दिला आहे. "कोविड काळात राज्य सरकारने चांगले काम केले आहे. विशेषतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मी कौतुक करते. राजकीय मंचावर येऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचे विषय वेगळे असतात. आरोग्य हा असा विषय आहे की त्यामध्ये कोरोनाचा सामना करत असताना राज्य सरकारने सतर्क राहून कार्य केले" या शब्दात प्रीतम मुंडे यांनी राज्य सरकारचे कौतुक केले आहे. राज्यात सुरू असलेल्या भोंग्याच्या मुद्यावरूनही मुंडे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. "धर्मा-धर्मात दुही निर्माण होतेय हे निश्चितच निराशाजनक आहे. ज्याआधी आपल्या समाजात गुण्या गोविंदाने गोष्टी नांदत होत्या, त्यामध्ये अचानक आलेली ही विषमता अस्वस्थ करणारी आहे. आजचा हा विषय नसला तरी कधी ना कधी राजकीय लोकांना याला सामोरे जावं लागणार असल्याची खंतही प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केली आहे. 

Similar News