बिहारमध्ये नितीशकुमार यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विशेष अधिवेशनात आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला.

Update: 2022-08-24 14:17 GMT

नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडत तेजस्वी यादव यांच्या पाठींब्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर बिहार सरकारने बोलवलेल्या विशेष अधिवेशनात नितीश कुमार-तेजस्वी यादव यांच्या सरकारने आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला. तसेच महागठबंधन सरकारने भाजप नेते विजय कुमार यांच्यावर अविश्वासदर्शक ठराव मांडला होता. मात्र विजय कुमार यांनी अविश्वास ठराव मांडण्यापुर्वीच विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

नितीश कुमार सरकारने बोलवलेल्या विशेष अधिवेशनात विश्वासदर्शक ठरावावर बोलताना बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यामध्ये तेदस्वी यादव म्हणाले की, ED, CBI आणि आयकर विभाग हे केंद्र सरकारचे जावई आहे. त्यामुळे जे लोक भाजपला शरण जात नाहीत. त्यांच्यावर सरकारच्या या जावयांकडून दबाव आणला जातो. तसेच पुढे बोलताना तेजस्वी यादव म्हणाले की, राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या काळात झालेल्या कथित नोकरी घोटाळ्याप्रकरणी RJD नेत्यांच्या घरावर बहुमत चाचणीपुर्वी CBI ने छापेमारी केली.

नितीश कुमार सरकारला बहुमतासाठी 122 आमदारांचा पाठींबा आवश्यक होता. मात्र नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह डावे पक्ष, काँग्रेस या पक्षांनी स्थापन केलेल्या महागठबंधन सरकारकडे 160 पेक्षा जास्त आमदारांचा पाठींबा होता. त्यामुळे नितीश कुमार यांच्या सरकारने बहुमत चाचणीचा ठराव जिंकला. मात्र विश्वासदर्शक ठरावावर मतदान करताना भाजपने सभात्याग केला.

नितीश कुमार-भाजप सरकारच्या काळातील विधानसभाध्यक्ष असलेल्या विजय कुमार सिन्हा यांची भाजपने गटनेतेपदी निवड केली. तसेच सम्राट चौधरी यांना विधानपरिषदेच्या गटनेतेपदी नियुक्ती केली.

बिहारमध्ये विधानसभाध्यक्षपदाची निवडणूक 26 ऑगस्ट रोजी होणार आहे. यासंदर्भातील माहिती विधानसभेचे उपाध्यक्ष महेश्वर हजारी यांनी दिली.

नितीश कुमार यांचा भाजपवर हल्लाबोल

नितीश कुमार म्हणाले की, काही विधानसभा सदस्यांनी सभात्याग केला. त्यावरून नितीश कुमार म्हणाले की, तुम्ही सगळे पळत आहात. तुम्हाला तुमच्या आकाकडून आदेश मिळाला आहे का? असा सवाल केला आहे.

Tags:    

Similar News