Kala Ghoda history : मुंबईच्या इतिहासातील विसरलेला लढवय्या : बाबू मुंबरकरांनी फोर्टमधील काळा घोडा कसा हटवला?

कोण आहेत बाबुराव मुंबरकर ? काय आहे काळा घोडा परिसराचा इतिहास? शिवसेनाआधी मराठीसाठी लढणाऱ्या व्यक्तिमत्वाविषयी ज्येष्ठ पत्रकार संजय साबडे यांचा लेख

Update: 2026-03-04 07:28 GMT

Quit India movement Mumbai मुंबईत व बाहेर झालेल्या ‘चले जाव’चा लढा, नाविकांचं बंड, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, झोपडीवासीयांचे अधिकार, इंग्रजी पाट्या व प्रतीकं हटवण्याची चळवळ, गिरणी कामगारांचं संघटन या व अशा आंदोलनांमध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. वेगवेगळ्या पक्षांचे नेते त्यात होते. पण त्या सर्वांत एक जण कायम उठून दिसत असे, तो पुढे असे. पण आज मुंबईकरांना त्याचं नावही माहीत नाही. त्याच्या नावाचा एक चौक परळमध्ये आहे. Baburao Mumbarkar साथी बाबुराव मुंबरकर चौक. पण हा कोण ही माहितीच नंतरच्या पिढ्यांना मिळाली वा दिली गेली नाही.


मित्रमंडळी व समाजवादी आणि डाव्या चळवळीतील सहकारी यांच्यासाठी तो नुसता बाबू वा बाबू मुंबरकर होता. बाबू हे झापटलेलं वादळच होतं. या एका माणसामुळे जहांगीर आर्ट गॅलरीपाशी असलेला काळा घोडा एके रात्री अचानक हटवण्यात आला आणि गुपचूप राणीच्या बागेत ठेवण्यात आला. ब्रिटिश साम्राज्यवादाची प्रतीकं नष्ट करायला हवीत, अशी समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांची भूमिका होती. बाबू हा त्यांचा व जॉर्ज फर्नांडिस यांचा कट्टर समर्थक होता. त्यामुळे ब्रिटिशकालीन पुतळे व अन्य प्रतीकं तोडून टाकू, त्यावर डांबर फासू, असा इशारा बाबू मुंबरकर यांनी दिला होता. काळा घोडा ताबडतोब हटवा, अन्यथा तोही शिल्लक राहणार नाही, असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं होत. केवळ त्याच्या इशाऱ्यामुळे तो हटवला गेला.


शिवसेनेचा जन्म व्हायच्या आधी त्यांनी मुंबईतील दुकानांच्या इंग्रजी पाट्या पुसून टाका, मुंबईतील पाट्या मराठीतच असायला हव्यात, यासाठी आंदोलन केलं होतं. त्यासाठी दक्षिण मुंबईतील अनेक इंग्रजी पाट्यांवर काळं डांबर फासलं होता. सर्व वर्तमानपत्रांना त्यांची दखल घ्यावीच लागत असे. मुंबईत मराठी हीच कारभाराची भाषा असायला हवी, यासाठी ते आग्रही व सक्रिय होते.

राजे सातवे एडवर्ड (प्रिन्स ऑफ वेल्स) यांच्या सन्मानार्थ त्यांचा पुतळा ज्यू उद्योजक व दानशूर अल्बर्ट अब्दुल्ला डेव्हीड ससून यांनी दिलेल्या देणगीतून बनवण्यात आला. त्यामुळे जहांगीर आर्ट गॅलरीच्या आसपासचा तो संपूर्ण परिसर ‘काळा घोडा’ या नावाने ओळखला जाऊ लागला. जुन्या विधान भवानाकडे जाणारे सारे मोर्चे पोलीस या पुतळ्यापाशी अडवत. त्यामुळे त्याला खूप महत्व होतं. काहींच्या म्हणण्यानुसार पुतळ्यातील राजे सातवे एडवर्ड यांचं शीर उडवलं जाण्याची शक्यता होती. त्यामुळे तो हलवला गेला खरा, पण तो परिसर कायम काळा घोडा म्हणूनच लोकांच्या लक्षात राहिला. काळा घोडा हे अनेक वर्षे लोकांच्या भेटण्याचं ठिकाण होतं.

तिथं काही वर्षांपूर्वी सांस्कृतिक महोत्सव सुरू झाला. त्याला नाव दिलं गेलं काळा घोडा महोत्सव. मग या मंडळींनी तिथं पुन्हा काळा घोडा आणा, बसवा, अशी मागणी सुरू केली. ती बरीच वर्षं मान्य झाली नाही. पुढे 2017 साली तिथं एका काळ्या घोड्याचा पुतळा बसवण्यात आला. तो आजही आहे. मात्र त्यावर राजे सातवे एडवर्ड नाहीत. नुसताच काळा घोडा आहे तो.


मुंबईत 1946 मध्ये नाविकांचं बंड झालं. ते देशभर पसरलं. त्यामुळे ब्रिटिश सरकार हादरलं होतं. त्यावेळी या बंडाला पाठिंबा देणाऱ्यांत व त्यांना जेवण पुरवण्यात बाबू मुंबरकर आघाडीवर होते. त्यांनी 1942 च्या छोडो भारत आंदोलनात परळ भागातील कामगारांचं नेतृत्व केलं होतं. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात गिरणगावातील लोकांना संघटित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. एवढंच नव्हे, तर मुंबई व सुरतमधील गिरणी कामगारांना त्यांनी संघटित केलं. मुंबई महापालिकेने 1965 साली ऐन पावसाळ्यात माहीमच्या झोपड्या पाडल्या. त्या पावसात एक लहान मूल मरण पावलं. तेव्हा मुंबईतील झोपडीवासीयांनी बाबू मुंबरकर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर प्रचंड मोर्चा काढला होता. मुंबरकरांच्या हातात मुलाचा मृतदेह होता. सारं वातावरण पालिकेविरुद्ध होतं. या मोर्च्यामुळे एक मोठा निर्णय झाला. पावसाळ्यात झोपड्या पाडल्या जाणारं नाहीत, अशी घोषणा मुंबई महापालिकेने केली.

परळला रेल्वे मैदानापाशी आता म्हाडाच्या इमारती आहेत. तिथे पूर्वी लक्ष्मी कॉटेज नावाने चाळी होत्या. बाबुराव मुंबरकर व त्यांची पत्नी तुळसा तिथे राहायचे. नंतर बरीच वर्षं तुळसा या म्युनिसिपल मजदूर युनियनचं काम करत. त्यांचं तळमजल्यावर घर नी ऑफिस. तिथे बाबू मुंबरकरना भेटायला मधू लिमये, जॉर्ज फर्नांडिस, मृणाल गोरे, सोहनसिंग कोहली, लक्ष्मण जाधव, प्रमिला फुले (निळू यांची बहीण) हे जात. मुंबरकर यांचे हे नेते. पण ते या साध्या, पण मजबूत कार्यकर्त्याची ताकद ओळखून होते. बाबुराव हे रस्त्यावरील लढवय्ये होते. पण आज गिरणगावालाही बाबुराव मुंबरकर माहीत नाहीत. एका चौकापुरतंच या लढवय्या कार्यकर्त्याचं नाव शिल्लक आहे.

(साभार - सदर पोस्ट संजय साबडे यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)


Kala Ghoda Mumbai history, Kala Ghoda Mumbai history, Black Horse Fort Mumbai, Forgotten freedom fighters Mumbai, Mumbai political movements history, Samyukta Maharashtra movement leaders, Mumbai mill workers movement, Sailors revolt 1946 Mumbai, Quit India movement Mumbai, Mumbai socialist leaders

Similar News