एकदा ऐकाच : दिवाळीतही एसटी कर्मचारी संपावर जाण्याचे कारण काय?

Update: 2021-11-04 11:21 GMT

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेले आंदोलन आता आणखी चिघळले आहे. राज्य सरकारसोबतच्या चर्चेत तोडगा निघाला आणि त्यानंतर उपोषण मागे घेतल्याचे जाहीर झाले. पण त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व ५ मागण्या मान्य न झाल्याने अनेक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला आहे. सरकारने या संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. पण तरीही हे कर्मचारी माघार घ्यायला तयार नाहीत. आता तर या एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय देखील आंदोलनात सहभागी झाले आहेत.

वर्ध्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी आंदोलनाच्या ठिकाणीच भाजी-भाकतरी खाऊन आपली व्यथा मांडली. कोरोना काळात आपल्या जीवाची परवा न करता बाहेर प्रांतातून येणाऱ्या जाणाऱ्या मजुरांना तसेच नागरिकांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी पोहचवण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम केले... परंतु अजूनही त्यांच्या मागण्यांना राज्य सरकारन गांभीर्याने घेत नसल्याने दिवाळी सारख्या सणाच्या दिवशी एसटी कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांनी बेसन भाकर खाऊन दिवाळी साजरी केली.

महिना ७ ते८ हजारा एसटी कर्मचारी कसा जगतो, याची जाणीव सरकारला आहे का? असा सवाल एका महिला कर्मचाऱ्याने विचारला आहे. तर आमच्या वडिलांचा पगार आम्ही सांगू शकत नाही एवढाच आहे, असे एका मुलीने सांगितले. तर पैसा नसल्याने आम्हाला शिकताही येत नाही, अशाही भावना एका मुलीने व्यक्त केल्या. एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करु नये असे आवाहन सरकार करते आहे. पण आत्महत्येचे काहीतरी कारण आहे, त्याचा विचार सरकार का करत नाही असा सवाल काही महिला कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

Tags:    

Similar News