'बेस्ट सीएम' च्या नेतृत्वाखालील निर्यातीतील वाटा तब्बल 4 टक्क्यांनी घसरला - आ. भातखळकर

Update: 2021-09-16 12:38 GMT

देशाच्या एकूण निर्यातीत पूर्वी 24 टक्के असणाऱ्या महाराष्ट्राचा वाटा आता महाविकास आघाडी सरकारच्या या वर्षी तब्बल 4 टक्क्यांनी कमी झाला आहे. कोविडच्या काळातही संपूर्ण देशांची निर्यात वाढत असताना महाराष्ट्राचा वाट मात्र कमी होणे हे दुर्दैवी असून मुख्यमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेचा व राज्यातील उद्योग विरोधी वातावरणाचा ढळढळीत पुरावा आहे अशी टीका भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. एवढेच नाही तर नीती आयोगाकडून जाहीर केलेल्या एक्सपोर्ट प्रीपेडनेस इंडेक्समध्ये सुद्धा महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे ,राज्याची उत्पादन क्षमता वाढावी व उद्योगाचे विकेंद्रीकरण व्हावे या करिता केंद्र सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या एक जिल्हा एक उत्पादनातही महाराष्ट्र दुर्दैवाने पिछाडीवर पडला आहे, राज्यातील धुळे, जळगाव, अमरावती, अकोला, गडचिरोली व हिंगोली यासारख्या जिल्ह्यामध्ये उत्पादन वाढीसाठी कोणतेही विशेष प्रयत्न राज्य सरकारकडून केले जात नाहीत आहेत, हेही दिसून आले आहे असं आमदार भातखळकर म्हणाले.

सोबतच देशातील अनेक राज्यांनी या योजनेसाठी विशेष यंत्रणा व वेबसाईट सुरु केलेली असताना ठाकरे सरकार या विषयात सुस्त बसले आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्याचे जीएसटी संकलन 3728 कोटी रुपयांनी कमी झाले असताना आणि टेस्ला सारख्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्या असतानाच आता निर्यातीत सुद्धा महाराष्ट्र पिछाडीवर गेल्याची आकडेवारी समोर येणे हि राज्यासाठी चिंतेची बाब आहे, किमान आता तरी उद्योग विभागाने 'भूषणावह उद्योग' सोडून या क्षेत्राच्या वाढीसाठी उपाययोजना कराव्या असे सुद्धा आ. भातखळकर म्हणाले.

Tags:    

Similar News