मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गामध्ये 6000 हजार 200 पदच्या भरतीसाठीची परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे, यावरून राजकिय नेत्यांसह अनेकांनी प्रतिक्रिया देत सरकारवर जोरदार टीका केली आहे, दरम्यान ओबीसी समाजाचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी देखील सरकारवर टीका करताना ज्या अधिकाऱ्यांनी ब्लॅकलिस्ट कंपनीला हे काम दिलं होतं त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान यावेळी बोलताना प्रकाश अण्णा शेंडगे म्हणाले की, या गोंधळाचा तब्बल 8 लाख विद्यार्थ्यांना याचा फटका बसलेला आहे. हे विद्यार्थी या महाराष्ट्रातील गरीब समाजातील, मातंग समाजातील, ओबीसीचे भटक्या मुक्त समाजातील, मराठा समाजातील गरीब शेतकऱ्यांची मुले आहेत आणि त्यांच्याबद्दल सरकारने असा गोंधळ करणं योग्य नाही, यातील प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षा फॉर्मसाठी चारशे तीस रुपये भरले होते आणि परीक्षा फी शंभर रुपये असे पाचशे तीस रुपये भरलेले आहेत असे जवळपास साडे 42 कोटी सरकारी तिजोरीत जमा झाले आहे.
आधी बेरोजगारीने त्रस्त झालेल्या या उमेदवारांची घरची परिस्थिती हालाखीची असताना त्यांनी कशीबसी फी भरली, परिक्षेची तयारी केली.आणि ऐनवेळी सरकारने ही परीक्षा रद्द केली. हे महाराष्ट्र शासनाला भूषणावह नाही ज्या अधिकाऱ्यांनी ब्लॅकलिस्ट कंपनीला हे काम दिलं होतं त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी शेंडगे यांनी सरकारला केलेली आहे.