सुका मेवा महागला!

अफगाणिस्तान आणि इराण संकटामुळे दरात वाढ

Update: 2026-04-03 16:56 GMT

सर्वसामान्यांच्या खिशाला आता आणखी एक कात्री बसणार आहे. जागतिक राजकीय घडामोडी आणि अफगाणिस्तान-इराणमधील व्यापार मार्गांमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे भारतात ड्रायफ्रूट्सच्या (सुका मेवा) किमतीत मोठी वाढ झाली आहे. मनुका, खजूर आणि पिस्ता यांसारख्या रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमती सरासरी २० ते ३० टक्क्यांनी वाढल्या असून काही विशिष्ट प्रकारच्या सुक्या मेव्याच्या दरांनी उच्चांक गाठला आहे.

आयातीवर का झाला परिणाम?

अफगाणिस्तान आणि इराणमधील वाढता तणाव तसेच पाकिस्तानसोबतच्या सीमा विवादांमुळे मालवाहतूक विस्कळीत झाली आहे. थेट जमिनीवरून होणारी वाहतूक थांबल्याने अनेक कन्टेनर्स अडकून पडले आहेत. परिणामी, पुरवठा कमी झाल्याने बाजारपेठेत किमती वाढल्या आहेत.

वाहतूक खर्च वाढला

वाहतूकदारांना आता लांबचा समुद्री मार्ग किंवा महागड्या विमान वाहतुकीचा (Air Cargo) आधार घ्यावा लागत आहे. यामुळे मालवाहतुकीचे भाडे आणि विम्याचा खर्च (Freight and Insurance costs) मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याचा थेट भार ग्राहकांच्या खिशावर पडत आहे.

सुका मेवा महागला!

पिस्त्याच्या दरात प्रति किलो २०० ते ४०० रुपयांची वाढ

इराणी बदाम (मामरा)१८०० रुपयांवरून थेट २८०० रुपयांपर्यंत पोहचला

अंजीर व जर्दाळू दरांमध्ये ३० ते ५० टक्क्यांची वाढ.

पुरवठा कमी झाल्याने मनुका आणि खजूराच्या किंमत २० टक्क्यांनी वधारल्या

सणासुदीच्या काळात फटका

सध्या लग्नसराई आणि सणासुदीचा काळ जवळ येत असतानाच ही दरवाढ झाल्याने मिठाई उत्पादक आणि सामान्य ग्राहक चिंतेत आहेत. हॉटेल व्यवसाय, बेकरी आणि कन्फेक्शनरी उद्योगालाही याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जर परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर येत्या काळात सुका मेवा आणखी महाग होऊ शकतो, असा अंदाज बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Tags:    

Similar News