सरकार कोणतेही असो महामंडळाचा वापर हात मारुन घेण्यासाठीच झाला - राजू शेट्टी

Update: 2021-11-10 02:51 GMT

मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांनी राज्यभर सुरु केलेल्या आंदोलनास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठींबा दिला आहे. केवळ राजकारण्यांच्या भ्रष्टाचारामुळेच एसटी महामंडळ तोट्यात गेले असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केला. परभणी येथील गंगाखेड रस्त्यावर एसटी विभागीय कार्यशाळेसमोर सुरु असलेल्या बेमुदत उपोषणस्थळी राजू शेट्टी यांनी भेट दिली. दरम्यान त्यांनी कर्मचार्‍यांच्या मागण्या ऐकून घेत त्यांच्याशी संवाद साधला. आतापर्यंत ज्याने त्याने एसटी महामंडळाचा वापर हात मारुन घेण्यासाठीच केला आहे.

महाविकास आघाडीचे सरकार असो की त्याआधीचे भाजपचे सरकार, दोन्ही सरकारने एसटी कर्मचार्‍यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.असा घणाघात शेट्टी यांनी केला. सरकार लोकप्रिय घोषणा करते आणि त्याचा बोजा लालपरीवर टाकते. त्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी कुठल्याही रकमेची तरतूद केली जात नाही. परिणामी एसटी तोट्यात जाते. लालपरीचे सर्वसामान्यांशी अतिशय जवळचे नाते असून आम्ही एसटीचा पास काढून शिक्षण घेतलेले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Tags:    

Similar News