"मोदी सरकारच्या संरक्षण आणि परराष्ट्र धोरणातील चुकांमुळे २० जवानांचा बळी"

Update: 2020-06-19 04:29 GMT

चीनच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीआधी सामनामधून मोदी सरकारलाच २० जवानांच्या मृत्यूला जबाबदार धरण्यात आले आहे. काय म्हटले आहे अग्रलेखात ते पाहूया...

चीनला धडा शिकवण्यासाठी सीमेवर जवानांची मोर्चेबांधणी वगैरे ठीक आहे. हवाई दलही तैनात केले. रणगाडे नेऊन ठेवले हे सर्व तर जागेवर राहीलच, पण चीनची आर्थिक कोंडी करणे तर काही प्रमाणात नक्कीच शक्य आहे. चीनकडून आपल्या देशात येणाऱया हजारो वस्तूंवर बहिष्कार टाकायला हवा. पण ही स्वदेशी जागृती दाखवायची जनतेने. मात्र ज्या अनेक चिनी कंपन्या हिंदुस्थानात पसरल्या आहेत त्यांचे काय करणार आहात? महाराष्ट्रातून जरी एखादी चिनी कंपनी हद्दपार केली गेली तरी तिच्याशी दुसरे एखादे राज्य करार करू शकते. तेव्हा हिंदुस्थानातील चिनी कंपन्यांबाबत केंद्र सरकारनेच एक राष्ट्रीय धोरण आखण्याची गरज आहे. दोन देशांत सहा लाख कोटींचा व्यापार होतो. गुंतवणूक व रोजगार दोन्ही बाजूला आहे, पण फायदा जास्त चीनलाच होतो आहे.

दोन देशांत चांगले संबंध निर्माण होत असतानाच ते बिघडण्याचे काम अमेरिकेमुळे झाले. चीन हा आमचा सगळय़ात महत्त्वाचा शेजारी आहे हे विसरता येणार नाही. पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंकेसारखे शेजारी हिंदुस्थानला जुमानत नाहीत. तेथे हिंदुस्थान-अमेरिकेची मैत्री सुरू झाली म्हणून चीनसारखे राष्ट्र मागे हटेल असे होणार नाही. मोदी हे पंतप्रधान झाल्यावर जगभरात गेले. पण रशिया किंवा इस्राएलसारख्या राष्ट्रांनीही चीनबरोबरच्या संघर्षात हिंदुस्थानची बाजू घेतली नाही. तुमचे आपसातले भांडण तुम्ही मिटवा हाच त्यांचा संदेश आहे.

हे ही वाचा..

"सामना" अग्रलेखावर बाळासाहेब थोरात यांची पहिली प्रतिक्रिया

'सामना' तून कॉंग्रेस वर टीका, भाजप आमदार राम कदम यांनी ‘या’ शब्दात घेतला महाविकास आघाडीचा समाचार

"काँग्रेस म्हणजे कुरकुरणारी जुनी खाट" शिवसेनेचे सामनामधून चिमटे

कोणत्याही राष्ट्राचे परराष्ट्रीय धोरण त्याच्या शेजारी राष्ट्रांसंबंधीच्या धोरणावरच निश्चित होत असते. चीन आणि पाकिस्तान यांच्या धोरणांची दखल घेऊनच आपल्याला विदेश धोरणाची दिशा निश्चित केली पाहिजे. कारण हिंदुस्थानविरोध या समान भूमिकेवरून ही दोन राष्ट्रे एक झाली आहेत. त्यामुळे या राष्ट्रांपैकी कोणत्याही एका राष्ट्राशी संघर्ष निर्माण झाला तर आपल्याला त्या दोघांविरुद्ध लढावे लागणार आहे हे ध्यानात ठेवले पाहिजे. आपण आपली संरक्षण सिद्धता कितीही वाढवली तरी आपल्याला एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढता येणार नाही.

संरक्षण आणि परराष्ट्र या दोन महत्त्वाच्या खात्यांतील अविभाज्य संबंधांचे आपल्याला विस्मरण झाले आणि त्यापायीच 1962 च्या ऑक्टोबरमध्ये चीनने एक धक्का देताच आपली नामुष्की झाली. त्या चुकीचे खापर आपण पंडित नेहरूंवर फोडत राहिलो. पण त्या चुकीपासून आजच्या राज्यकर्त्यांनी धडा घेतला असे दिसत नाही. संरक्षण-परराष्ट्र धोरणासंदर्भात त्याच मनमानी चुका करून आपण आपल्या 20 जवानांचे बळी घेतलेत व चीनलाही अंगावर ओढून घेतले. नेहरूंच्या काळात चिन्यांशी लढताना आमचे सैनिक विषम स्थितीत होते. साधे कॅनव्हासचे बूट, शस्त्र-गोळय़ांची टंचाई, अनोळखी प्रदेश अशी तेव्हा परिस्थिती होती. आज सर्वकाही आहे, पण तरीही चिन्यांनी आमच्या जवानांचे क्रूर बळी घेतले. पंडित नेहरूंना दोष देणाऱयांनी आत्मपरीक्षण केले तरी 20 जवानांचे बलिदान सार्थकी लागेल!

Similar News