'सामना' तून कॉंग्रेस वर टीका, भाजप आमदार राम कदम यांनी ‘या’ शब्दात घेतला महाविकास आघाडीचा समाचार
X
महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला महत्त्व दिले जात नाही. याची तक्रार वारंवार मंत्री आणि नेते करत आहेत. याला सामनामधून आज उत्तर देण्यात आले आहे. काँग्रेसचे दोन ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनीही जरा आमचेही ऐका, असे म्हटल्याने महाविकास आघाडीत कुरबुरी असल्याचे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून कबूल करण्यात आले आहे. पण त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्यांना चिमटे काढत राष्ट्रवादी काँग्रेस जसे सहकार्य करत आहे तसे काँग्रेस करत नसल्याची टीका केली आहे. यावरुनच आज भाजप आमदार राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकार वर निशाणा साधला आहे.
मुंबई मध्ये अनेक पेशंटला खाटा मिळत नाही. म्हणून लोकांचा तडफडून मृत्यू होत आहे. मात्र, या तीन पक्षाच्या शासनाला स्वतःच्या खाटाची आणि खुर्चीचे पडले आहे. आज लॉकडाउनला ८३ दिवस झाले आहेत. तरी या सरकारने गोरगरीब आणि शेतकऱ्यांना एका पैशाचीही मदत केलेली नाही. असा आरोप राम कदम यांनी केला आहे.
आजचा सामनाचा अग्रलेख वाचल्यानंतर लक्षात येते की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या पद्धतीने अपमानित केले आहे. त्यानंतर या दोन्ही पक्षाचे स्वाभिमान शिल्लक राहिले की नाही याचे आत्मचिंतन करावे लागेल. अजूनही आमची सरकारला विनंती आहे की त्यांनी गंभीर व्हावे. स्वतःच्या खुर्चीची चिंता नंतर करावी आणि ज्या लोकांना खाटा मिळत नाही आणि जी गोरगरिबांची उपासमार होत आहे. त्याची अगोदर चिंता करावी. असं म्हटलं आहे.