राष्ट्र सेवा दला तर्फे कोरोनाने मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑनलाईन सभांचे आयोजन

Update: 2021-05-06 14:21 GMT

करोना विषाणू संसर्गाला बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्याकरता राष्ट्र सेवा दला तर्फे शुक्रवार, दिनांक 7 मे 2021 पासून पुढील पाच शुक्रवार ऑनलाईन श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. कोरोना महामारी म्हणजे भारताच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात उद्ध्वस्तकारक आपत्ती आहे. आजपर्यंत या विषाणू संसर्गाने जवळजवळ दोन कोटी नागरिकांना बाधित केले आहे. तर दरदिवशी सुमारे चार लाख नवे संसर्गित रुग्ण आढळत आहेत. मे महिन्याच्या मध्यापर्यंत अशा नव्या बाधित रुग्णांची रोजची संख्या सात आठ लाखांपर्यंत वाढण्याची भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या कोरोना साथीची दुसरी लाट सुरू आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार भविष्यात भारतात या साथीची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. आपण या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचारही केलेला नाही.

आधुनिक भारताच्या इतिहासात आजपर्यंत आलेल्या अन्य कोणत्याही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीत बळी पडलेल्या नागरिकांच्या संख्येपेक्षा या साथीत बळी पडलेल्या नागरिकांची संख्या खूप अधिक आहे. प्रश्न आहे आपण एक समाज म्हणून या राक्षसी संकटाला कसे तोंड देणार आहोत? याचा एक मार्ग म्हणजे देशाची आरोग्य व्यवस्था बळकट करणे आणि त्याला मानवी संसाधनांची जोड देणे. कोरोना लस उत्पादन आणि ऑक्सीजन उत्पादनाला गती देणे.

कोरोना संसर्गाच्या फटक्याने आजपर्यंत देशातील कोट्यावधी कुटूंब उद्ध्वस्त झाली आहेत. या कुटुंबानी आपली जवळच्या प्रिय व्यक्ती गमावल्या आहेत,आपली उपजिविकेची साधने गमावली आहेत, जगण्याची उमेदच गमावली आहे. कोरोना हे एक व्यक्तिगत संकट नाही. ते एक अभूतपूर्व सार्वत्रिक असे जागतिक संकट आहे. या संकट समयी आपण साथीत विविध प्रकारे बळी ठरलेल्या नागरिकांचे स्मरण करुन त्यांना आपली आदरांजली अर्पण करू. पण त्याच बरोबर द्वेष, आणि अन्याय सहन करत विविध संघर्ष करताना बलिदान करणाऱ्या सर्व धैर्यवान भारतीयांना केलेला तो मानाचा मुजरा असावा.




 


राष्ट्र सेवा दलातर्फे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात कोरोना संसर्गीत रुग्णांना विविध प्रकारे अमूल्य असे साहाय्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्र सेवा दला तर्फे कोरोना साथीला बळी पडलेल्यांचे स्मरण करण्यासाठी ऑन-लाईन श्रद्धांजली व निर्धार सभांचे आयोजन केले जात आहे. यात आपल्याला सोडून गेलेल्यांच्या स्मरणार्थ दोन ते तीन मिनीटांची छोटी भाषणे होतील.

Tags:    

Similar News