खासगी बस चालकांकडून एसटी बंदचा गैरफायदा घेत प्रवाशांची लूट

Update: 2021-11-11 14:31 GMT

ठाणे : विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी मागील काही दिवसापासून बंदचे हत्यार उपसले आहे. परंतु प्रवाशांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने आता ठाण्यातील दोन डेपोतून खासगी बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. परंतु या बसेसकडून लुट सुरु असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. या खासगी बसेस बुधवारपासून सोडण्यात येत आहेत. परंतु शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच भाडे आकारले जात असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. तर आरटीओ कडून देखील खासगी बसेसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. परंतु तरी देखील खासगी बस हे अधिकचे भाडे वसुल करीत आहेत.

ठाणे जिल्ह्यातही एसटी कर्मचाऱ्यांनी रविवार पासून बंदची हाक दिली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोरपर्यंत बंद कायम राहिल असेही कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या या भुमिकेमुळे प्रवाशांचे हाल सुरु झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी जाता यावे या उद्देशाने आता एसटी महामंडळ आणि आरटीओने खासगी बस सेवेत हजर केल्या आहेत. त्यानुसार आरटीओकडून बुधवारी ३१ बसेस विविध मार्गावर सोडल्या होत्या. यात ५८५ प्रवाशांनी त्याचा लाभ घेतला. तर खोपट आणि वंदना एसटी डेपोतूनही आता खासगी बसेस सोडल्या जात आहेत.

शासकीय दरानुसारच भाडे आकारावे असे खासगी बसवाल्यांना सांगण्यात आले आहे. परंतु असे असतांनाही जास्तीचे भाडे आकारले जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. पुण्याला जाताना साधारणपणे २८० ते २९५ रुपये भाडे आकारले जाते. परंतु खासगी बसेसकडून ३५० ते ४०० रुपये भाडे आकरले जात असल्याचे प्रवाशांनी सांगितले. इतर मार्गावर देखील अशीच लुट सुरु असल्याचे दिसत आहे. वास्तविक पाहता शासकीय जे दर आहेत, ते दर आकारणे गरजेचे असतांनाही खासगी बस चालक प्रवाशांकडून लुट करीत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला.

Similar News