दरडग्रस्त तळीये गावाच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार ; डिसेंबर अखेरीस कामाला सुरुवात होण्याची शक्यता

Update: 2021-11-03 03:45 GMT

रायगड : रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्त तळीये गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून त्याबाबत सविस्तर आराखडा नुकताच पूर्ण करण्यात आला. या आराखड्यास मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया पूर्ण करून डिसेंबर अखेरीस कामाला सुरुवात करण्याचे म्हाडाचे नियोजन असल्याचे समजत आहे.

त्यानुसार १७ हेक्टर जागेवर पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात येणार असून एका कुटुंबाचे ३००० चौ. फूट जागेवर पुनर्वसन केले जाणार असून यात ६०० चौ. फुटांच्या घराचा समावेश आहे.

जुलै महिन्यात तळीये गावातील कोंढाळकरवाडी येथे दरड कोसळून त्यात ऐंशीहून अधिक गावकऱ्यांचा बळी गेला होता. कोंढाळकर वाडीसह दरड कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असलेल्या तळीयेतील अन्य वाड्यांचे पुनर्वसन म्हाडा, रायगड जिल्हाधिकारी आणि मदत व पुनर्वसन विभागाकडून करण्यात येत आहे. त्यासाठीचा आराखडा देखील पूर्ण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली आहे. तळीयेतील १७ हेक्टर जमीन यासाठी संपादित करण्यात आलयाचेही त्यांनी सांगितले आहे. प्रत्येक कुटुंबाला ३००० चौ. फूट जागा देण्यात येणार असून यात ६०० चौ. फुटांच्या 'प्री फॅब' पद्धतीच्या घराचा समावेश असेल. तसेच शाळा, अंगणवाडी, पिण्याच्या पाण्याची टाकी आणि अन्य आवश्यक त्या सुविधांचाही आराखड्यात समावेश करण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

म्हाडाच्या कोकण मंडळाकडून घरांची बांधणी करण्यात येणार आहे. इतर आराखड्यातील सर्व सुविधांचे बांधकामही कोकण मंडळ करणार आहे. या सुविधांचा विकास करण्यासाठी मदत आणि पुनर्वसन विभागाकडून कोकण मंडळाला आर्थिक निधी दिला जाणार असल्याचेही कल्याणकर यांनी स्पष्ट केले.

Tags:    

Similar News