अजितदादांसाठी बारामतीत मोर्चा, FIR साठी रोहित पवार आक्रमक, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते बारामतीत दाखल
बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बारामती पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांनी गर्दी केलीय. यामध्ये कर्जत-जामखेड, फलटण इथून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते बारामतीत दाखल झाले आहेत.
२८ जानेवारी २०२६ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती इथं विमान अपघातामध्ये दुर्देवी निधन झालं. त्यानंतर काही दिवसांनी कर्जत-जामखेड इथले आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन हा घातपात असल्याचा दावा करत चौकशीची मागणी केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही याप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, २५ फेब्रुवारी २०२६ रोजी आमदार रोहित पवार यांनी मुंबईतल्या मरीन लाईन्स पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्याचा प्रयत्न केला. बीएनएस कायद्याअंतर्गत झीरो एफआयआर दाखल करण्याची रोहित पवारांची मागणी होती. मात्र, मुंबईतही गुन्हा नोंदविण्यात आला नाही. त्यामुळं अखेर आमदार रोहित पवारांनी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी बारामती तालुका पोलीस ठाणे गाठून गुन्हा नोंदविण्यासाठी आंदोलन सुरु केले.
यावेळी रोहित पवारांसोबतच युगेंद्र पवार, राजेंद्र पवार यांनीही बारामती तालुका पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरु केलंय. यावेळी वकीलही मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. दरम्यान, या ठिय्या आंदोलनात बारामतीसह, कर्जत-जामखेड, फलटण आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते बारामतीत दाखल झाले आहेत.
दरम्यान, माध्यमांशी बोलतांना रोहित पवारांनी आणखी एक खळबळजनक दावा केलाय. ते म्हणाले, “ अजितदादांच्या विमान अपघातामागे नक्कीच कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचा हात आहे. त्यामुळं या अपघाताची तांत्रिक बाबींबरोबरच गुन्हेगारी अंगानंही तपासणी केली जावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केलीय.
विमान अपघातानंतर लगेचच मी एफआयआर दाखल करु शकलो असतो, मात्र आणखी खोलात जाऊन माहिती गोळा करण्यासाठी थांबल्याचं रोहित पवारांनी सांगितलं. डीजीसीएनं २४ फेब्रुवारीच्या त्यांच्या अहवालात व्हीएसआर कंपनीचे दोष दाखवले होते. त्याचबरोबर व्हीएसआर कंपनीच्या ५ विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं होतं म्हणजेच ती विमानं ग्राऊंड करण्यात आली होती. जर ही विमानं ग्राऊंड करण्यात आली होती तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना सदोष विमान चुकून दिलं होतं की जाणूनबुजून दिलं होतं याचा तपास करणे आवश्यक असल्याचं आमदार रोहित पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी गुन्हा नोदंविण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड सहकारी साखर कारखाना, बारामती ऍग्रो शुगर फॅक्टरी, केव्हीके (कृषी विज्ञान केंद्र), शारदा नगर, बारामती आणि बारामती शहरातील काही कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या कार्यकर्त्यांमध्ये कर्जत-जामखेड या विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते तसेच फलटण येथील शरयू साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याचं दिसतंय.