खंडित वीज पुरवठ्याचा चौकशीचे आदेश; संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Update: 2020-10-12 09:18 GMT

मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रामध्ये अचानकपणे खंडित झालेल्या वीज पुरवठ्यामुळे अवघी मुंबापुरी पडल्याची दखल राज्य सरकारने गंभीरपणे घेतली असून मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी 4 वाजता वर्षा येथे महत्वाची बैठक बोलाविली आहे.या बैठकीस ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्रसाद तनपुरे , ऊर्जा सचिव असीम गुप्ता सहभागी होणार आहेत.

मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली व मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी असेही त्यांनी सांगितले.

मुंबईतील संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत तसेच कोण जबाबदार आहेत त्याबाबत चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.दरम्यान सकाळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करून अडचण होणार नाही याबाबत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या

या सर्व काळात वीज पुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे व तात्काळ मदत करावी असेही त्यांनी मुख्य सचिव व मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितले.

उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असेही त्यांनी निर्देश दिले आहेत.

Tags:    

Similar News