Manipur Violence : मणिपूरच्या दौऱ्यावर INDIA चे खासदार जाणार, हिंसा झालेल्या भागांचा दौरा करणार

Update: 2023-07-27 14:44 GMT

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूर हिंसाचाराच्या घटनेवरून प्रचंड गदारोळ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर निवेदन करण्याची मागणी विरोधकांनी जोरदारपणे लावून धरली. मात्र, त्याला प्रतिसाद मिळालाच नाही. अखेर विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला, ज्यावर लवकरच चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, आता विरोधकांची नवी आघाडी असलेल्या INDIA चे (Indian National Developmental Inclusive Aliance) खासदार मणिपूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

INDIA या नव्या आघाडीतील सर्व घटकपक्षांचं एक प्रतिनिधीमंडळ आता मणिपूरच्या दौऱ्यावर जाणार आहे. येत्या २९,३० जुलै असे दोन दिवस हे प्रतिनिधीमंडळ मणिपूरमध्ये हिंसाचार झालेल्या भागांचा दौरा करणार आहे.

काँग्रेसचे लोकसभेतील नेते मणिकम टागौर यांनी याविषयी सांगितलं की, INDIA च्या आघाडीतील मित्रपक्षांच्या २० पेक्षा अधिक खासदारांचं शिष्टमंडळ मणिपूरचा दौरा करणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच मणिपूरचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी मणिपूरमधील हिंसा प्रभावित परिसरातील लोकांशी चर्चा केली. दरम्यान, राहुल गांधी यांच्या मणिपूर दौऱ्यावरूनही मोठा विवाद झाला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेमध्ये मणिपूर हिंसाचारवर निवेदन करण्याच्या विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यानं अखेर विरोधकांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. त्यावर संसदेत चर्चेला मान्यता मिळालीय. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला हे सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करून या प्रस्तावावर चर्चेची तारीख निश्चित करतील.

Tags:    

Similar News