शिक्षणमंत्र्याच्या घरासमोर विद्यार्थांचं आंदोलन, शिक्षणमंत्र्याची पहिली प्रतिक्रिया

Update: 2022-01-31 14:45 GMT

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी बारावीच्या परिक्षा ऑनलाईन होणार नसुन ऑफलाईनच होणार आहेत असे स्पष्ट केले आहे.याच विरोधात दहावी बारावीचे विद्यार्थी रस्त्यांवर उतरुन आंदोलन करत आहेत. धारावीमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केल्याचं समोर आलं आहे, या प्रकरणावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विद्यार्थांना परीक्षेसाठी दुर जावं लागू नये, यासाठी ते शिकत असलेल्या शाळांमध्ये परीक्षा घेण्यासाठी आमचे प्रयत्न सूरू आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत आम्हाला कोणतीही रिस्क घ्यायची नाही, त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आम्ही विचार करतोय, तज्ज्ञांशी चर्चा करतोय," असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. "आज झालेल्या मोर्चानंतर मी त्यांच्या संघटनेच्या प्रमुखांशी बातचीत केली. त्यांना मी चर्चेसाठी बोलावलंय. त्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेऊ. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही चर्चा करू. १०वी आणि १२वीच्या परीक्षा लवकर घेण्याचा आमचा मानस आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या पुढील वर्गातील प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडणार नाहीत" असंही त्यांनी सांगितलं.

"काही मुलांची मागणी ऑनलाइन परीक्षा घेण्याची आहे, तर काहींची मागणी ऑफलाइन परीक्षा घ्या, अशी आहे. महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे परीक्षा घेण्यात अडचणी येत आहेत. महाराष्ट्रात १०वी आणि १२वीच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३० लाखांपेक्षा जास्त आहे. राज्यभर एकाच दिवशी एकाच वेळी परीक्षा घेतली जाते. राज्यातील आदिवासी भागात आणि खेडेगावात लोक राहतात. गेल्या दोन वर्षात करोनामुळे बरीच परिस्थिती बदलली आहे. विद्यार्थ्यांवर देखील करोना आणि परीक्षा असं दुहेरी टेन्शन आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही परीक्षेचा वेळ वाढवण्यासारखे निर्णय घेत आहोत". असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Tags:    

Similar News