गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड बाबत येणाऱ्या वृत्तांनी बॉलिवूड पूर्णपणे हादरलं आहे. या संदर्भात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'बॉलीवूडला गेल्या काही दिवसांपासून ठराविक वर्गाकडून बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत ते कधीही सहन केले जाणार नाहीत', असा इशारा दिला आहे.
ते आज मल्टिप्लेक्स, सिनेमागृहे मालकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा करत होते. यावेळी त्यांनी हा इशारा दिला. यावेळी लवकरच SOP तयार करुन सिनेमागृह सुरु करण्यासंदर्भात आश्वस्त केलं. मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिकच नाही तर सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. आज हॉलीवूड सिनेमांना तोडीस तोड असे सिनेमे बॉलीवूडमध्ये बनत आहे. या बॉलीवूड सिनेमांचा चाहतावर्ग जगभर आहे.
सिनेमासृष्टी हा एक मोठे मनोरंजन उद्योग क्षेत्र असून या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते तर सिनेमांमुळे आपले कलाकार लोकप्रिय होतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक वर्गाकडून बॉलीवूडला बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे.बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत. ते कधीही सहन केले जाणार नाहीत. असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.