मुंबई विमानतळ राहणार सहा तासांसाठी बंद, जाणून घ्या नेमकं कारण

देशातील अत्यंत महत्वाचं विमानतळ असलेले छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सहा तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Update: 2023-10-17 04:55 GMT

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील अत्यंत महत्वाचं विमानतळ आहे. या विमानतळावरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. त्यातच प्रवाशांच्या प्रवासासाठी उत्तमोत्तम सुविधा देण्यासाठी विमानतळ प्रशासन नेहमी कार्यरत असते. तर चालू आर्थिक वर्षात आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यात 2023 च्या तिमाहीत 1 कोटी 27 लाख लोकांनी प्रवास केला आहे. मात्र हे विमानतळ तब्बल सहा तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय विमानतळ प्रशासनाने घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्ट्यांची दुरूस्ती करण्यासाठी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत धावपट्ट्या बंद ठेवण्यात येणार आहेत. या सहा तासांच्या कालावधीत मुंबई विमानतळावरून एकही उड्डाण होणार नसल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले आहे. मात्र तब्बल सहा तास विमानतळ बंद राहणार असल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. मात्र विमानतळ प्रशासनाने याआधीच यासंदर्भात माहिती दिली होती.




Tags:    

Similar News