गोरगरिबांचे वकील म्हणून ओळख असणारे अॅड. विजयपाल सावंत यांचे दुःखद निधन

गोरगरिबांचे वकील म्हणून ओळख असणाऱ्या रायगडच्या पेण तालुक्यातील अॅड. विजयपाल सावंत यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने आंबेडकरी बहुजन चळवळीची मोठी हानी झाल्याची भावना विविध स्तरातून व्यक्त होत आहे.

Update: 2021-07-27 12:14 GMT

गोरगरिबांचे वकील म्हणून ओळख असणाऱ्या रायगडच्या पेण तालुक्यातील अॅड. विजयपाल सावंत यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने आंबेडकरी बहुजन चळवळीची मोठी हानी झाल्याची भावना विविध स्तरातून व्यक्त होत आहे.

रायगड // रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बेणसे सिध्दार्थनगर येथील तरुण तडफदार व निष्णात वकील म्हणून ओळखले जाणारे अॅड विजयपाल गौतम सावंत यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले ते 37 वर्षांचे होते. त्यांच्या आकस्मित निधनाने आंबेडकरी बहुजन चळवळीची खूप मोठी हानी झाली असून ती कधीही भरून निघणार नाही अशा भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने नागोठणे शिहू विभागासह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. 

अॅड. विजयपाल सावंत यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपला आदर्श व  प्रेरणास्थानी ठेवले, अत्यंत कष्ट घेत प्रतिकूल हलाखीच्या परिस्थितीवर मात करून जिद्ध, आत्मविश्वास, व अथक परिश्रमाच्या जोरावर एलएलबी, एल.एल.एम व जर्नालिझमचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले, अशातच काका उत्तम सावंत व काकी छायाबाई सावंत, आई अनुसयाबाई सावंत यांनी त्यांना संगोपन व  शिक्षणासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले.

वकिलीक्षेत्रात काम करत असतांना त्यांनी गोरगरिब जनतेला नेहमीच न्याय देण्याची भूमिका घेतली. गोरगरीब - सर्वसामान्यांचे सावंत वकील म्हणून त्यांची ओळख होती. नेहमीच इतरांच्या अडीअडचणीत कामी येणारे सावंत वकील गेल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे .

बहुजन महापुरुषांचे आचार विचार व शिकवण अंगिकारल्यास जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहत नाही असा दृढ विश्वास असल्यामुळेच त्यांनी पुरोगामी व परिवर्तनवादी चळवळीत झोकून देवून काम केले. बहुजन समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांचे नेहमीच योगदान राहिले. त्यांच्या जाण्याने चळवळीची प्रचंड हानी झाल्याची भावना विविध स्तरातील मान्यवरांनी व्यक्त केली.

Tags:    

Similar News