''पंधरा ते वीस आमदार संपर्कात..'' राज्यात पुन्हा राजकीय भूकंप घडणार?

Update: 2023-02-25 03:25 GMT

राज्यातील राजकारणात दररोज वेगवेगळे प्रसंग आपण पाहत आहोत. नक्की या राजकारणात काय सुरू आहे? असा प्रश्न देखील अनेकांना पडला असेल. कारण मागच्या सहा महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात जे घडतंय ते अत्यंत नाट्यमय असं आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले त्यानंतर आपल्यासोबत वीसहून अधिक आमदार घेऊन ते पहिला सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. काही दिवसात शिंदे आणि फडणवीस म्हणजेच शिंदे गट आणि भाजप एकत्र येत सरकार स्थापन केलं, या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेनेवरच दावा केला. अनेक दिवस यावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली आणि अखेर निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्ता संघर्षावर सुद्धा सुनावली सुरू आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर ही सुनावणी सुरू आहे. शिवसेनेचा व्हीप मोडल्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात यावं अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात याबाबतचा जर काही निर्णय आला आणि सर्वोच्च न्यायालयाने या 16 आमदारांना अपात्र ठरवलं तर राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडू शकते. याविषयी अनेक शक्यता तर्क-वितर्क लावले जात आहेत.

सध्या पुणे येथील कसबा आणि पिंपरी चिंचवड मध्ये पोटनिवडणुक सुरू आहे. या पोटनिवडणुकांच्या प्रचारादरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका लागू शकतील अशी शक्यता बोलून दाखवली. या सगळ्याचं कारण होतं सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला सत्ता संघर्षावरील सुनावणी.. न्यायालयाने या 16 आमदारांना अपात्र ठरवलं तर राज्यात मध्यावधी निवडणुका लागू शकतात असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. उद्धव ठाकरे यांच्या या विधानानंतर शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी म्हटल आहे की, मध्यावधी निवडणुका लागण्याची काहीही शक्यता नाही आमच्याकडे 170 आमदारांचे बहुमत आहे शिवाय पंधरा ते वीस आमदार आमच्या संपर्कात आहेत. आता उदय सामंत यांनी असे विधान केल्यानंतर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आला आहे

Tags:    

Similar News