सभागृहात फडणवीसांविरोधात थोरात-पटोले-गायकवाड आक्रमक

Update: 2023-07-26 11:22 GMT

भाजप नेते किरीट सोमय्यांचा व्हायरल व्हिडिओ, इरशाळवाडी दुर्घटना, नुकसानभरपाई, बोगस बियाणं हे मुद्दे विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गाजले. त्यानंतर बुधवारी आज पुन्हा एकदा विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. मात्र, सरकारकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यानं विरोधकांनी सभात्याग केला.

नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी तालुक्यातील सोनेगाव इथल्या एका गर्भवती महिलेला मुख्य रस्त्यापर्यंत जाण्यासाठी अडीच किलोमीटर पायपीट करावी लागली. त्यानंतर ती महिला इगतपूरीच्या दवाखान्यात पोहोचली. मात्र, तिथं डॉक्टरचं उपस्थित नव्हते. त्यामुळं त्या महिलेला वाडीवारे या गावात आणलं गेलं. या दरम्यान गर्भवती महिलेची प्रकृती ढासळली आणि तिचा मृत्यू झाला. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आदिवासी महिलेचा केवळ उपचार न मिळाल्यानं मृत्यू होतो. म्हणून याप्रकरणी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्थगन प्रस्ताव मांडला.

अशावेळी सर्व कामकाज बाजूला ठेवून या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणीच थोरात यांनी केली. त्याला प्रतिसाद देत नाना पटोले आणि वर्षा गायकवाड यांनीही सरकारला जाब विचारला. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला निवेदन करायला सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चर्चेची तयारी दर्शवली. मात्र, आत्ताच चर्चा करण्याच्या मागणीवर विरोधक ठाम राहिले. यावेळी फडणवीस यांनी विरोधकांना चर्चेसाठी तयार असल्याचं सांगितलं. मात्र, ही चर्चा नंतर करू असं त्यांचं म्हणणं होतं. इतक्या वर्षात तुम्ही हा प्रश्न निकाली का नाही काढला असं सांगत फडणवीसांनी म्हटलं की, तुम्ही याप्रकरणात राजकारण करत आहात, आम्हांला राजकारण करायचं नाहीये म्हणत विरोधकांना फटकारलं. दरम्यान, विरोधकांनी यानंतर सभात्याग केला.

Full View




 


Tags:    

Similar News