भाजपाला कदापी माफ करणार नाही- संजय राऊत

धुलिवंदनाच्या कार्यक्रमादरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आपण माफ केले आणि कटुता संपवली, असं वक्तव्य केले होते. त्यावर आज ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज्यातील जनता भाजपाला कदापी माफ करणार नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

Update: 2023-03-09 08:36 GMT

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी धुलिवंदनाच्या (Dhulivandan) दिवशी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आम्ही विरोधकांना माफ केलं आणि कटुता संपवली, असं विधान केले होते. त्यांच्या या विधानावर आज ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यावेळी राऊत यांनी राज्यातील जनता भाजपला कदापी माफ करणार नसल्याचे सांगितले. तसेच भाजपाने आम्हाला माफ करावं, अशी मागणी कोणीही केली नव्हती, असा टोला फडणवीसांना यावेळी राऊत यांनी लगावला. याउलट त्यांना माफ करायचं की नाही, हे आम्ही ठरवणार असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसांच्या स्वाभिमानासाठी काम करणारा एक हिंदुत्त्ववादी पक्ष ज्यापद्धतीने भाजपने (BJP) फोडला. तो महाराष्ट्रावर केलेला आघात असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. आणि राज्यातील जनता हे कधीच विसरणार नसल्याचे राऊत यांनी सांगितले.

भाजपाने मैत्रीचा हात पुढे केला, तर भाजपाशी (BJP) मैत्री होईल का? भाजपाशी यापुढे कधीही मैत्री होणार नसल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर देताना सांगितले. राजकारणात मतभेद होत असतात. याअगोदर सुद्धा अनेकदा टोकाचे मतभेद झाले. पण बाळासाहेबांचा पक्ष ज्यांनी फोडला त्या चोरांशी आम्ही कधीही मैत्री करणार नसल्याचे राऊत यावेळी म्हणाले. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) भाजपाला पाठिंबा दिल्याच्या मुद्द्यावर राऊत यांनी सांगितले की, भाजपाने (BJP) तिथे सत्ता स्थापन केलेली नाही, तिथल्या प्रादेशिक पक्षाने तिथे सत्ता स्थापन केली आहे आणि भाजपा (BJP) त्या सत्तेमध्ये सहभागी झाला आहे. रिओ यांच्या पक्षासोबत भाजपाची युती आहे. भाजपाला १० ते १२ जागा मिळाल्या आहेत. आणि येथील अनेक लहान पक्षांनी एकत्र येऊन सरकार बनवलं असल्याचे राऊत म्हणाले.

नागालँड (Nagaland) हे सीमेवरचे राज्य आहे आणि ते संवेदनशील राज्य सुद्धा आहे.ते काश्मीरपेक्षा (Kashmir) जास्त संवेदनशील राज्य आहे. तिथेही दहशतवाद आणि इतर कारवायांचा धोका अधिक आहे. त्यामुळे नागालँडची (Nagaland) भौगोलिक आणि सुरक्षाविषयक परिस्थिती अनेकदा काश्मीरपेक्षा अत्यंत गंभीर असते. तिथल्या मुख्य पक्षाचं सरकार तिथे आहे. त्यामुळे तिथे भाजपाचे सरकार नसून, भाजपा सरकारमध्ये इतर पक्षांसमवेत सहभागी झाला असल्याची माहिती संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली.    

Tags:    

Similar News