CAA कायद्यामुऴे मुस्लिमांचे कोणतेही नुकसान नाही, मोहन भागवतांचा दावा

Update: 2021-07-21 14:45 GMT

CAA (Citizenship Amendment Act) आणि NRC (National Register of Citizens) वरुन निर्माण झालेला वाद कोरोनामुळे मागे पडला असला तरी तो संपलेला नाही. आता तर या मुद्यावरुन पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. याला कारण ठरले आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य...CAA मुळे मुस्लिम नागरिकांचे कोणतेही नुकसान होणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे. CAA संदर्भातील एका पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होत. हा कार्यक्रम गुवाहाटी इथे आयोजित कऱण्यात आला होता.

CAA आणि NRC याबाबत देशात जो वाद निर्माण करण्यात येतोय तो केवळ राजकीय आहे, असेही मत भागवत यांनी व्यक्त केले आहे. CAA आणि NRC या दोन्ही कायद्यांचा हिंदू आणि मुस्लिम यांच्यात फूट पाडण्याशी काही संबंध नाहीये. या कायद्यांच्या भोवती होणारी फूट पाडण्याची चर्चा केवळ राजकीय लाभासाठी केली असल्याचा आरोप त्यांनी केली.

या कायद्यांमुळे मुस्लिम नागरिकांचे कोणतेही नुकसान होणार नाही. याउलट CAA कायद्यामुळे आपल्या शेजारच्या देशातील पीडित अल्पसंख्याकांना संरक्षण मिळेल, असा दावाही त्यांनी केला आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशातील अल्पसंख्याक नागरिकांची पुरेपूर काळजी घेतली असे सांगितले होते, आताही तसे केले जात आहे आणि यापुढेही करत राहणार आहोत, कोणत्याही मुस्लिम नागरिकाचे नुकसान होणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.

NRC चे समर्थन करताना भागवत यांनी, आपल्या देशात कोण कोण नागरिक आहेत

हे जाणून घेण्याचा देशाला अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. पण या प्रक्रियेमध्ये सरकार सहभागी असल्याने त्याकडे राजकीय दृष्टीनेही पाहिले जाते. पण CAA, NRCमुळे धार्मिक फूट पडेल असे मुददे केवळ राजकीय लाभासाठी पसरवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांची चर्चा आता सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्याने या मुद्द्यावरुनही आता पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Tags:    

Similar News