मनोज जरांगेंची आजपासून पुन्हा उपोषणाला सुरवात

मराठा आरक्षाणाचे "जोपर्यंत कायद्यात रूपांतर होत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही," अशी ठाम भूमिकाच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी घेतली आहे.

Update: 2024-02-10 06:13 GMT

Jalana : मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे हे आजपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत मराठा आरक्षणासाठी 9 ऑगस्ट 2023 पासून मनोज जरांगे पाटील वारंवार उपोषण करत आहेत. पहिल्या टप्प्यात करण्यात आलेलं उपोषण 17 दिवस चाललं. त्यावेळी सरकारनं 40 दिवसांचा वेळ मागून घेतला होता. परंतु, दिलेल्या कालावधीत सरकारनं काहीही केलं नाही, असा आरोप करत जरांगे पाटील पुन्हा 25 ऑक्टोबरपासून उपोषणाला बसले होते. ते उपोषण आठ दिवस चाललं. त्यावेळी सरकारने दोन महिन्यांचा अवधी जरांगेंना दिला होता

सरकारने त्वरीत अधिसूचनेची अंमलबजावणी करावी

सरकार वारंवार वेळ काढूपणा करत असल्याने जरांगे यांनी सरसकट मराठा समाजाला मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याची हाक देण्यात आली. या आंदोलनात लाखो मराठ्यांचे वादळ नवी मुंबई वाशी याठिकाणी धडकल्यानंतर सरकारनं धावाधाव करून नोंदी मिळालेल्यांना तत्काळ प्रमाणपत्र देण्यासंबंधी अधिसूचना काढली. परंतु, सग्यासोयऱ्यांच्या बाबतीत असलेली गोंधळ कायम ठेवला असल्याचं जरांगे यांचं म्हणणं आहे.

आजपासून पुन्हा आंतरवाली सराटीत जरांगेंच उपोषण

मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचं अधिवेशन बोलवून कायदा करावा, अशी जोरदार मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्याच मागणीसाठी जरांगे पाटील आजपासून उपोषणाला बसले आहेत. जरांगे यांनी आपण 10 तारखेला नवीन अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी उपोषणाला बसणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं. त्यामुळे आज सकाळी 10 वाजल्यापासून मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहेत. विशेष म्हणजे उपोषणाला बसण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी मुंबईसह विविध भागातील लोकांच्या गाठीभेटी घेतल्या आणि पुन्हा आंदोलनाला बसले आहेत.

आरक्षणाचा कायदा पारित होत नाही तो पर्यंत मागार नाही

"येत्या दोन दिवसांत विशेष अधिवेशन बोलावून सग्यासोयऱ्यांबाबत काढलेल्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करून अंमलबजावणी करावी. मागासवर्ग आयोगाने जो अहवाल दिलेला आहे, त्याबाबत विशेष अधिवेशनात कायदा पारित करून न्यायालयासमोर तो अहवाल सादर केला पाहिजे. मात्र, जोपर्यंत कायद्यात रूपांतर होत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही," अशी ठाम भूमिकाच जरांगे यांनी घेतली. राज्यातील मराठा समाजाचा पुन्हा एकदा घात होवू नये, त्यामुळंच पुन्हा उपोषण करणार असल्याचंही जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान, आजपासून सुरु होणारं आमरण उपोषण कठोर उपोषण असणार आहे, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय.

Tags:    

Similar News