MHADA's Pending Promotions : म्हाडाच्या कार्यक्षमतेला गळती... यामागील शुक्राचार्य कोण?

सर्वसामान्यांना परवडणारे घरं देणाऱ्या म्हाडामध्ये नेमकं काय सुरु? म्हाडाच्या प्रगतीवर कुणाचा डोळा? न्यायालयाचा आदेश असूनही अधिकाऱ्यांचे प्रमोशन का थांबले आहेत? यावर लेखक डॉ. सुभाष देसाई यांचं भाष्य

Update: 2026-02-11 11:15 GMT

MHADA Efficiency  स्वातंत्र्यानंतर मुंबईमध्ये पागडी पद्धतीने इमारती भाड्याने दिल्या जात होत्या. पण त्या नादुरुस्ती झाल्यावर कोणी दुरुस्ती करत नव्हते. त्यामुळे त्या इमारती पडू लागल्या आणि भाडेकरूंच्या जीविताला धोका निर्माण झाला. त्यांना सुरक्षितता लावावी म्हणून प्रथम महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डची स्थापना झाली. त्यानंतर त्याच रुपांतर १९७१ मध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडा मध्ये झालं. दिवसेंदिवस म्हाडाचा व्याप वाढू लागला. त्यासाठी तीन चीफ इंजिनियर, १० डेप्युटी चीफ इंजिनियर, २६ एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर आणि मोठा स्टाफ नेमण्यात आला. साधारण वार्षिक उलाढाल १२,००० कोटी पर्यंत गेली. ही प्रगती बघितल्यानंतर शासनाच्या तोंडाला पाणी सुटले आणि म्हाडाच्या ठेवीमधून मोठ्या प्रमाणामध्ये धारावी प्रोजेक्ट, समृद्धी प्रोजेक्ट साठी 2,000 कोटी रुपयांच्या ठेवी वापरायला घेतल्या. खात्रीलायकपणे समजते की, या ठेवी म्हाडाला परत मिळालेल्या नाहीत.







 



२०२२ पासून म्हाडामध्ये पदोन्नतीच झालेल्या नाही. त्यामुळे म्हाडाची कार्यक्षमता ढासळली आहे. मध्यंतरी मुंबादेवीचे आमदार अमीन पटेल यांनी हिवाळी अधिवेशनात लक्ष वेधी मांडली होती. त्यांच्या मतदारसंघात इमारतीचा भाग कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. आणि त्याचा ठपका म्हाडा ला पूर्ण वेळ कार्यकारी अभियंता त्या भागात नव्हता यावर ठेवण्यात आला. या विषयावर १४ डिसेंबर २०२५ ला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक महिन्याच्या आत रेंगाळलेल्या पदोन्नती झाल्या पाहिजे असे बजावले. संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी ते मान्य केले. पण आज दोन महिने झाले तरी कारवाई झालेली नाही. हा सभागृहाचा आणि यासंदर्भात आलेल्या एका न्यायालय निकालाचा अवमानच आहे.




 


म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जवळच्या व्यक्तीला बेकायदेशीर प्रमोशन हवे आहे आणि त्यामुळे त्यांनी इतरांची गोची केली आहे हाच तो झारीतील शुक्राचार्य म्हाडाला तापदायक बनला आहे, असे नाव न सांगण्याच्या अटीवर म्हाडातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगत गौप्यस्फोट आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालण्याची गरज आहे, असे एकंदर वातावरण आहे. निकाल लागायचा तेव्हा लागेल पण म्हाडाच्या सगळ्या डेप्युटी इंजिनियर्सनी देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत त्याचे काय ? असा प्रश्न उपस्थित होतो.

Similar News