मनपा निवडणुकीच्या तोंडावर नामकरणाच्या वादाला फोडणी

नवी मुंबई ( navi mumbai airport)विमानतळाच्या नामकरणाचा वाद थंड होतो न होतो तोच एका नव्या वादाने पुन्हा उचल घेतली आहे मुंबई महानगरपालिकेत(MCGM) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shivsena) टार्गेट करण्यासाठी भाजपने गोवंडी परिसरातील एका बागेच्या 'टिपू सुलतान' (Tipu sultan)नामकरणाचा मुद्दा पुढे केला आहे.

Update: 2021-07-17 14:49 GMT

यावेळी वादाचे कारण ठरले आहे ते टीपू सुलतान (Tipu Sultan) यांचे नाव. गोवंडी (govandi) परिसरातील समाजवादी पक्षाच्या (samajwadi party) नगरसेविका रुक्साना सिद्दीकी (rukhsana siddiqui corporator) यांनी त्यांच्या भागात नव्याने तयार करण्यात येणाऱ्या बागेला टिपू सुलतानचे नाव द्यावे असा प्रस्ताव जानेवारीमध्ये दिला होता. आता हा प्रस्ताव बाजार उद्यान समितीमध्ये आला असता भाजपने त्याला जोरदार विरोध केल्याने शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष पेटला आहे.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व बैठका ॲानलाईन घेतल्या जात आहेत. त्यात या वादाची भर पडल्याने अध्यक्षांनी सभा बरखास्त केली. या गोंधळात हा प्रस्ताव आयुक्तांकडे फेर विचारार्थ पाठवण्यात आला आहे. भाजप नगरसेविका स्वप्ना म्हात्रे यांनी या प्रस्तावाला विरोध करताना हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्यांनी केली त्या शिवरायांच्या भूमीत हिंदूंवर अन्याय करणाऱ्या जुलमी शासकाचे नाव आम्ही देवू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

तर विनोद यादव या भाजप नगरसेवकाने मुंबई महापालिकेने चुकीचा पायंडा पाडू नये, असं आवाहन केलं आहे. यावर शिवसेनेनं सावध भूमिका घेतली असून जे कायद्यात असेल ते करू, असं म्हटलं आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्येक नगरसेवकाला त्याच्या वॅार्डमध्ये असे नाव प्रस्तावित करण्याचा अधिकार आहे, असे म्हणून समाजवादी पक्षाला एका प्रकारे समर्थन देण्याचा प्रयत्न केला आहे. पण नियमानुसार, एखाद्या बागेला आधीच हे नाव दिले असेल तर ते पुन्हा देता येत नाही. मालवणी इथं एका उद्यानाला आधीच हे नाव दिले असल्याची माहिती आहे.

भाजप खासदार मनोज कोटक यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केले आणि त्यांच्यावर निशाणा साधत म्हणाले, जेव्हा मी घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड उड्डाणपुलाचे नाव "छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल" असे ठेवले पाहिजे असा प्रस्ताव दिला होता तेव्हा शिवसेनेच्या खासदाराने या उड्डाणपुलास सूफी संत "सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज (मोइनुद्दीन सुफी चिश्ती- अजमेरी)" असे नाव देण्यास सांगितले होते. आता गोवंडी परिसरातील उद्यानास 'टिपू सुलतान' असे नाव देण्याच्या प्रस्तावाला शिवसेनेने पाठिंबा दर्शविला आहे. यातून असे दिसून येते की शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली आहे.

भाजपा एका नावावरून राजकारण करत आहे. हिंदूंना भडकवण्याचा काम भाजप करत असून निवडणुका आल्या की हिंदू-मुस्लिमांमध्ये घाणेरडे राजकारण भाजप करत असल्याचे प्रत्युत्तर नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी दिलंय.

भाजपने केलेल्या या टीकेनंतर आता महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर देत म्हटलं, शिवसेनेला भाजप उगाच बदनाम करु पाहत आहे. खरं तर गोवंडीत बाजीप्रभू देशपांडे मार्ग ते रफीक नाल्यापर्यंतच्या मार्गाला 2013 मध्ये तत्कालीन नगरसेवक मोहम्मद सिराज शेख यांनी टिपू सुलतान नाव देण्याची मागणी केली होती. इतकेच नाही तर 2013 मध्ये या प्रस्तावाला भाजप सदस्याने अनुमोदन देत पाठिंबा सुद्दा दिला होता.

हा सर्व वाद आणि संघर्ष पाहता आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकात भाजपने शिवसेनेला टार्गेट करण्यासाठीच नामकरणाचा मुद्दा उकरून काढल्याचे सांगितले जात आहे.

या विषयावर मॅक्स महाराष्ट्र वर विलास आठवले यांनी भाजप प्रवक्ते भालचंद्र शिरसाट आणि पत्रकार लोक देशपांडे यांच्याशी केलेली चर्चा:

Full View

Tags:    

Similar News