Stan Swamy यांच्यावरील खोट्या आरोपांच्या चौकशीचे आदेश द्या, दिग्गज नेत्यांचे राष्ट्रपतींना पत्र

एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव प्रकरणी अटकेत असलेल्या स्टॅन स्वामी यांच्या कोठडीतील मृत्यूचे आता तीव्र पडसाद उमटत आहेत. याप्रकरणी आता सोनिया गांधी, शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे

Update: 2021-07-06 15:43 GMT

नवी दिल्ली - आदिवासींच्या मानवी हक्कांसाठी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते स्टेन स्वामी यांच्यावर खोटे आरोप करत खटले दाखल करण्यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे. सोनिया गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी, एमके स्टालिन, सीताराम येचुरी यांच्यासह विरोधी पक्षांच्या १० नेत्यांनी मंगळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून मोदी सरकारला कारवाईचे आदेश द्यावे अशी मागणी केली आहे.

एवढेच नाही तर या पत्रात या सगळ्या नेत्यांनी आणखी एक मोठी मागणी केली आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात राजकीय हेतूने देशद्रोह, UAPA यासारख्या कायद्यांचा गैरवापर करुन अटक केलेल्या इतर आरोपींनाही तातडीने सोडून देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

फादर स्टेन स्वामी यांनी आपले संपूर्ण जीवन दलित आणि आदिवासी समाजासाठी वाहून घेतले होते. पण भीमा कोरोवा प्रकरणी स्टेन स्वामी यांना NIA अटक केल्यानंतर त्यांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली होती. या दरम्यान ८४ वर्षांच्या स्टेन स्वामी यंची प्रकृती खूप खालावल्याने कोर्टाच्या आदेशानंतर त्यांना मुंबईतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण उपाचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.

सोनिया गांधी, शरद पवार यांच्यासह विरोधीपक्षाच्या १० नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलेल्या पत्रात गंभीर आरोप केला आहे. एल्गार परिषद प्रकरणी स्टॅन स्वामी यांना खोट्या आरोपाखाली UAPA कायद्यांतर्गत तुरूंगात टाकले गेले होते. कारवाई करताना त्यांना असलेल्या विविध आजारांकडे दुर्लक्ष केले गेल्याचा आरोप या पत्राद्वारे करण्यात आला आहे. राष्ट्रपतींनी आपल्या अधिकारांचा वापर करत स्टॅन स्वामी यांच्यावर खोटे आरोप लावणाऱ्यांची चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश मोदी सरकारला द्यावे अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News