ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला घेरले आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण जाण्यास राज्य सरकारच जबाबदार आहे, असा आरोप फडणवीस वारंवार करत आहेत. पण देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यांना प्रा. हरी नरके यांनी उत्तर दिले आहे. एवढेच नाही तर ते खोटं बोलत आहेत, असा दावाही नरके यांनी केला आहे. प्रा. हरी नरके यांचे म्हणणे काय आहे ते पाहूया...
"प्रा. हरी नरके यांचा फडणवीस यांना सवाल"
१). केंद्राचा डेटा मागू नका म्हणता तर तुम्ही स्वतः १/८/२०१९ ला केंद्राकडे का मागितला होता?
२). तुमच्या ग्रामविकास मंत्र्यांनी ८ आठवड्यात आम्हाला सर्वोच्च न्यायालयाला माहिती द्यायचीय,तरी त्वरा करा असे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना का लिहिले होते?तुम्ही आठ आठवड्यात ही माहिती न्यायालयाला दिली नाही म्हणून आरक्षण गेले. हे पाप तुमचे.
३). जी माहिती २०१६ मध्ये मोदी सरकारने बॅन केली तिची पावती तुम्ही काँग्रेस सरकारवर का फाडता?
४) त्या माहितीत ८ कोटी चुका असल्याचा जावईशोध तुम्ही कसा लावला? केंद्र सरकारने तुम्हाला डझनावारी पत्रे लिहिली त्यात तर एकाही चुकीचा उल्लेख नाही, मग हा डेटा न बघताच तुम्हाला ८ कोटी चुका असल्याचा भास झाला का?
५). तुमच्या मातृसंस्थेने जातगणनेला लेखी विरोध केला होता (२४/५/२०१०) म्हणून तीत चुका असल्याचा डंका तुम्ही पिटताय, कोल्ह्याला द्राक्षे आंबट.
६). ३ महिन्यात डेटा जमवता येतो तर ६० महिने काय केले?
७). डेटात चुका होत्या तर मोदी सरकारने नवा, बिनचूक obc डेटा गेल्या ७ वर्षात का जमवला नाही?
८) न्या.रोहिणी आयोगाला डेटा दिला नाही म्हणता, मग ज्यांच्या ताब्यात तो आहे त्या RGI ना या आयोगात सदस्य कशासाठी नेमलंय?
९).केंद्र सरकार एकही चूक असल्याचे सांगत नसताना तुम्हाला ८ कोटी चुका कशा कळल्या?
फडणविसपंत, प्रश्न मी जाहीरपणे समाज माध्यमे व वाहिन्यांवरून तुम्हालाच विचारलेत,जाहीर उत्तरे द्या, पळ काढू नका. आरक्षण मुक्त भारताचे तुम्ही पाईक असताना बहुजनांचा बुद्धीभेद नी शब्दच्छल करण्याचा पिढीजात उद्योग का करताय? करता का आमने सामने चर्चा? ओपन चॅलेंज करतो आहे हिम्मत?
प्रा. हरी नरके