Nashik Marathi Christian Sahitya Sammelan : कसं होतं ख्रिस्ती साहित्य संमेलन ?

यंदा पहिल्यांदाच नाशिकमध्ये ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलन भरवलं गेलं होतं. या संमेलनाचं स्वरुप कसं होतं? या संमेलनाचा उद्देश काय होता? सांगताहेत लेखक कामिल पारखे

Update: 2026-01-22 10:37 GMT

Nashik Marathi Christian Sahitya Sammelan नाशिक येथे भरलेल्या तीन दिवसीय सत्ताविसाव्या अखिल भारतीय मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे रविवारी ११ जानेवारी २०२६ रोजी सूप वाजले. कवी सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली अगदी उत्साहात पार पडलेल्या या संमेलनाचा हा थोडक्यात वृत्तांत.

या संमेलनात अनेक लेखक, कवी आणि साहित्यप्रेमींनी भाग घेतला. उदघाटन सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे, संपादक-लेखक उत्तम कांबळे, स्वागताध्यक्ष फादर एरॉल फर्नांडिस आणि वसई धर्मप्रांताचे बिशप थॉमस डिसूझा यांची भाषणे झाली. संमेलनाच्या मंचाला `फादर फ्रान्सिस दिब्रिटो विचारपीठ' असे नाव देण्यात आले होते. फादर दिब्रिटो यांचे २०२० साली निधन झाल्यानंतर पहिल्यांदाच हे मराठी साहित्य संमेलन भरत होते. फलकावर एका बाजूला फादरांचे आणि दुसऱ्या बाजूला कविवर्य `कुसुमाग्रज' वि.वि. शिरवाडकर यांची छायाचित्रे होती. संमेलनाच्या प्रवेशद्वाराला रेव्ह. नारायण वामन टिळक आणि लक्ष्मीबाई टिळक यांची नावे देण्यात आली होती. संमेलनाच्या सुरुवातीलाच भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचे जमलेल्या सर्वांनी सामुदायिक वाचन केले.

साहित्य संमेलनाध्यक्ष सायमन मार्टिन यांच्या लिखित भाषणाच्या प्रती श्रोत्यांमध्ये वाटल्या होत्या, मात्र त्याशिवाय मार्टिन यांनी यावेळी उत्स्फूर्त मनोगत म्हणून उपस्थितांची मने जिकली. साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. अमित त्रिभुवन यांनी केले. कार्यक्रमस्थळी नुरील भोसले आणि सुनिल डिमेलो यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

संमेलनात झालेल्या विविध परिसंवादांत नितीन सरदार, डॉ. सुरेश पठारे, विनायक पंडित, देवदत्त कसोटे, वसंत गायकवाड, दिलीप नाईक, नीलिमा बंडेलू, कामिल पारखे, फादर आयवो कोयलो, `सुवार्ता' मासिकाचे संपादक फादर जोएल डिकुन्हा, आशिष शिंदे, सुहासिनी जाधव, वॉल्टर कांबळे, राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्र अध्यक्ष राजा कांदळकर, माजी सनदी अधिकारी बी जी वाघ वगैरेंनी भाग घेतला.

आजकाल कुठलीही `इव्हेन्ट’ असली कि तिथे सेलिब्रिटी लोकांबरोबर सेल्फी आणि फोटो घेतले जातात. इथे सेलेब्रिटी नसले तरी काही नामांकित व्यक्ती होत्या. या संमेलनात एका व्यक्तींबरोबर फोटो घेण्यासाठी काही जणांनी रांग लावली होती. ही व्यक्ती म्हणजे `सुताराचा पोर' ही कादंबरी लिहिणारे सनी पाटोळे. ख्रिस्ती वर्तुळाबाहेर चांगली ओळख असलेले सनी पाटोळे हे समकालीन ख्रिस्ती साहित्यिकांमधील एक महत्त्वाचे नाव आहे. येशू ख्रिस्तावर आधारीत `सुताराचा पोर', `मुक्तिदाता मोशे', आणि राष्ट्रपिता अब्राहाम, योहान (जॉन) असे जाडजूड चरित्रग्रंथ त्यांच्या नावावर आहेत आणि कॉन्टिनेन्टल प्रकाशनसारख्या नामवंत संस्थेने ही पुस्तके प्रकाशित केली आहेत.. सध्या त्यांनी नवी कादंबरी लिहायला घेतली आहे.

डोक्यावर पूर्ण सफेद केशसंभार आणि तशीच चंदेरी दाढी आणि वयोमानानुसार चालण्यावर आलेले बंधन असे व्यक्तिमत्व असलेल्या सनी पाटोळे यांनी आपल्या मनोगतातून श्रोत्यांची मने जिंकली. या सत्राच्या अध्यक्षस्थानी असलेल्या सिसिलिया कार्व्हालो यांनी सनी पाटोळे (जन्म १९४१, वय ८६) यांचे वर्णन `ज्ञानोवृद्ध' असे केले. आपल्या भाषणात सनी पाटोळे यांनी कॉन्टिनेटल प्रकाशनाने त्यांची `सुताराचा पोर' ही कादंबरी प्रकाशनासाठी कशी स्वीकारली याची रंजक माहिती दिली.


या साहित्य संमेलनात जमलेल्या श्रोत्यांची सर्वाधिक दाद मिळवणारा एक कार्यक्रम म्हणजे 'निमंत्रितांशी ऐसपैस गप्पा'. ऑस्ट्रेलियात राहून वसईशी आणि मराठी भाषेशी आपली नाळ कायम राखणारे उद्योजक रिचर्ड नुनीस आणि कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाशी यशस्वी सामना देणारे मधुमेहतज्ज्ञ आणि हृदयविकारावर उपचार करणारे एम.डी. डॉक्टर विनीत वानखेडे यांच्याशी या सत्रात खुद्द संमेलनाध्यक्ष सायमन मार्टिन यांनी संवाद साधला. `निरोप्या' मासिकाचे माजी संपादक फादर ज्यो गायकवाड सत्राच्या अध्यक्षस्थानी होते.

या संमेलनात फादर फ्रान्सिस कोरिया, सनी पाटोळे आणि मुक्ता अशोक टिळक यांचा सन्मान करण्यात आला. `गझल'कार रमण रणदिवे उपस्थित नसल्याने त्यांच्या वतीने त्यांच्या चिरंजीवाने हा सन्मान स्वीकारला. संमेलनात काव्य वाचनाची दोन सत्रे पर पडली. त्यात अनुपमा उजगरे, कांतिश तेलोरे, नरेश चव्हाण, अगस्तीन (राजा) पाटोळे, स्वरलता आंग्रे, फ्रँको डिसोझा, रोहिणी पंडित, अर्जुन दरोळे, अरुण घोडेराव वगैरेंनी भाग घेतला. दुसऱ्या दिवशी गूढवादी संत साधू सुंदरसिंग यांच्या जीवनावरील एक चित्रपट दाखवण्यात आला. समारोप समारंभात मावळते संमेलनाध्यक्ष पौलस वाघमारे यांनी आपले मनोगत मांडले

माजी संमेलनाध्यक्ष सिसिलिया कार्व्हालो आणि अनुपमा निरंजन उजगरे यांनी या साहित्य संमेलनांत सक्रिय सहभाग घेतला. या संमेलनात माजी संमेलनाध्यक्ष फादर मायकल जी. सुद्धा उपस्थित होते. संमेलनाच्या आयोजनांत महत्त्वाची भूमिका पार पडणाऱ्या फ्रान्सिस वाघमारे यांचा 'आदर्श कार्यकर्ता' म्हणून दहा हजार रुपयांचे पारितोषक देऊन सन्मान करण्यात आला. संमेलन यशस्वी होण्यासाठी वॉल्टर कांबळे, गिरीश भालतिडक, अंतोन भोसले, अरुण त्रिभुवन, माया त्रिभुवन, रोहिणी पंडित, सुहासिनी जाधव, अर्जुन दारोळे, फिलोमिना बागुल वगैरे स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठा हातभार लावला होता

कुठलेही साहित्य संमेलन म्हटले कि पुस्तकांचे अनेक स्टॉल्स असायला हवेच. इथे मात्र तसे चित्र दिसले नाही. ख्रिस्ती साहित्याच्या प्रकाशनाला वाहून घेतलेल्या जॉर्ज काळे यांच्या व्हाईट लाईट पब्लिकेशन्सचा या संमेलनाच्या साहित्य नगरीत एकमेव बुक स्टॉल होता. या बुक स्टॉलला लेखक-कविंनी आणि साहित्य प्रेमींनी अपेक्षापेक्षा चांगला प्रतिसाद दिला. देवदत्त नारायण टिळक यांनी लिहिलेले 'महाराष्ट्राची तेजस्विता पंडिता रमाबाई' हे चरित्र `ऑल टाइम बेस्ट सेलर' आहे हे या बुक स्टॉलवरील विक्रीवरून दिसून आले.

या संमेलनात पूर्वी कधीही न भेटलेल्या अनेक लोकांच्या गाठीभेटी झाल्या. विशेष नवलाची आणि सुखद धक्का देणारी बाब म्हणजे यापैकी अनेक लोक मला `निरोप्या' मासिकात नियमितपणे लिहिणारा लेखक म्हणून ओळखत होते. नाशिकच्या या ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला माझे `शतकातील मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने' हे पुस्तक छापून माझ्या हाती पडले होते. या संमेलनात विक्रीसाठी नेलेल्या या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळाला.




 नाशिक येथे भरलेले हे तिसरे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन. पहिले `महाराष्ट्रीय ख्रिस्ती साहित्य संमेलन' या गोदावरीच्या काठावर असलेल्या शहरातच शंभर वर्षांपूर्वी १९२७ साली रेव्हरंड निकोल मॅक्नीकल यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. त्यानंतर २००० साली सिलिया कार्व्हालो यांच्या अध्यक्षतेखाली अठरावे साहित्य संमेलन येथील किलबिल विद्यालयात पार पडले होते. नंतर `निरोप्या' मासिकाचे संपादक झालेले फादर ज्यो. मा. पिटेकर त्यावेळी स्वागताध्यक्ष होते.

नाशिकचे पहिले ख्रिस्ती साहित्य संमेलन `महाराष्ट्रीय ख्रिस्ती साहित्य संमेलन’ या नावाने भरले होते. गेल्या शंभर वर्षांत या साहित्य संमेलनाची अनेक नामकरणे झाली आहेत. त्यानिमित्त वादविवादसुद्धा झाले आहेत. यावेळीसुद्धा नामकरण झाले. `अखिल भारतीय मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन ' असे अधिक व्यापक, भारदस्त असे हे नामकरण आहे. आतापर्यंत मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने केवळ नाशिक, मुंबई, वसई, नगर, पुणे, बारामती, कोल्हापूर या शहरांत घेण्यात आली आहेत. आता `अखिल भारतीय मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन ' असे नामकरण झाल्याने ही संमेलने यापुढे गोवा, बेळगाव अशा ठिकाणी घेता येतील. यापैकी गोव्याबद्दल बोलायचे झाल्यास गोव्यातच सतराव्या शतकाच्या सुरुवातीला मराठी भाषेतले पहिले मुद्रित पुस्तक निघाले. ब्रिटिश येशूसंघीय धर्मगुरू फादर थॉमस स्टीफन्स यांचे `ख्रिस्तपुराण' मराठी महाकाव्य रोमी लिपीत १६१६ साली छापले गेले होते. 

Similar News