सावरकरांचे गीत संगीतबद्ध केले म्हणून ह्रदयनाथ मंगेशकर यांना काढले : पंतप्रधान मोदी

Update: 2022-02-08 08:13 GMT

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्ला केला. मोदींनी सोमवारी लोकसभेत बोलताना आपल्या संपूर्ण भाषणाचा रोख काँग्रेसवर ठेवला होता, राज्यसभेतही त्यांनी देशातील वाढती असहिष्णूता, चीनची दादागिरी, बेरोजगारी हे विषय टाळत काँग्रेसवर हल्ला केला.

गोवा मुक्तीसंग्रामाला ६० वर्षे झाली, त्यानिमित्ताने मोदींनी काँग्रेसवर टीका केली. "सरदार पटेल यांच्याकडून गोवा मुक्तीची रणनीती बनवली असती तर गोव्याला लवकर स्वातंत्र्य मिळालं असतं, पण पंडीत नेहरूंना शांतीदूत ही प्रतिमा बिघडेल म्हणून भीती वाटल्याने त्यांनी गोव्यावर आक्रमण केले नाही. सत्याग्रहींवर गोळ्या झाडल्या गेल्या, पण नेहरूंनी सैन्य द्यायला नकार दिला" असा आरोप केला.

एवढेच नाही तर मोदींनी पंडीत नेहरूंनी १९५५ मध्ये लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणाचा दाखला दिला. "कोई धोखे में ना रहे की हम गोवा में फ़ौजी कारवाई करेंगे, लेकिन हम फ़ौज नहीं भेजेंगे। हम शांती से तय करेंगे, जो लोग वहाँ जा रहा है, उन्हें वहाँ जाना मुबारक हो, लेकिन ये भी याद रहें की अपने को सत्याग्रही कह रहे तो सत्याग्रह की नियम भी याद रखें. सत्याग्रही के पीछे फ़ौज नहीं चल सकती" असे नेहरुंनी म्हटले होते, असे मोदींनी यावेळी सांगितले.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरुन बोलताना मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. "लता मंगेशकर यांच्या परिवारासोबत कसा व्यवहार केला हे सर्वांना कळलं पाहिजे, असे सांगत मोदी यांनी सावरकरांची कविता संगीतबद्ध केली आणि ऑल इंडीया रेडीयो वरून प्रसारित केल्याने ह्रदयनाथ मंगेशकर यांना काढून टाकण्यात आले होते, असेही मोदींनी यावेळी सांगितले. मजरूह सुलतानपुरी यांना नेहरूंवर टीका केली म्हणून जेलमध्ये ठेवण्यात आले होतं आणि किशोर कुमार यांनी आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांच्याविरोधात बोलल्यामुळे काढून टाकण्यात आलं होतं, असा आरोपही मोदींनी यावेळी केला.

Tags:    

Similar News