पवार कुटुंबीयांना देवेंद्र फडणवीसांबद्दल प्रचंड आकस- आ.प्रवीण दरेकर

Update: 2023-01-31 06:46 GMT

अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकार उलथवून लावले म्हणून पवार कुटूंबाची आकसापोटी टिका सुरु असल्याचे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सांगितले. त्याप्रमाणे पवार कुटुंबियांना देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल प्रचंड आकस असल्याचे सुद्धा दरेकर म्हणाले. ते कल्याण येथे पत्रकारांशी बोलत होते.

पवार कुटुंबीयांना देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल प्रचंड आकस आहे, कारण या महाराष्ट्रामध्ये पवारांशिवाय दुसरा कोणी मोठा नेता नाही, अशा प्रकारचा त्यांचा एक समज होता. जो देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जात पुसून काढला असल्याचे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सांगितले. गेल्या अडीच वर्षातील महाविकास आघाडी सरकार उलथवून जनतेच्या मनातलं सरकार आणल्यामुळे पवार कुटुंबियांच्या मनात फडणवीस यांच्याबद्दल द्वेष भरलेला आहे. आणि त्याचे प्रत्यंतर वारंवार येत असते. कधी अजित पवार यांच्या मुखातून येते तर कधी रोहित पवार, कधी सुप्रिया सुळे यांच्या मुखातून येते.

अधून मधून शरद पवार यांच्याही तोंडून देवेंद्र फडवणीस यांच्यावर तोंडसुख घेतलेले ऐकायला मिळते. आमची सत्ता पुन्हा राज्यातील जनतेने आणली होती. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जनतेचा कौल मान्य न करता जनतेच्या विरोधातील सरकार स्थापन करुन राज्यातील जनतेचा भ्रमनिरास केला होता. मात्र गेल्या सहा महिन्यांपूर्वी सत्तांतर घडून जे सरकार सत्तेवर आले आहे तेच खरे सरकार असल्याचे प्रविण दरेकर यांनी सांगितले आहे. तसेच राज्यात गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अत्यंत चांगले व उत्तम काम करत आहेत. हे सर्व पाहाता पवार कुटुंबियांना सत्तेचा पोटशूळ उठला आहे. शिंदे-फडणवीसांची जोडी उत्तम पद्धतीने राज्यात काम करत आहे. त्यामुळे आपलं राजकीय भविष्य काय याची चिंता पवार कुटुंबियांना लागून राहिली आहे. आणि मग देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका करण्याशिवाय पवार कुटुंबियांकडे कोणताच पर्याय उरलेला नाही. तसेच आकसापोटी टीका या पलीकडे या टिकेला महत्त्व देण्याचे काही कारण नसल्याचे दरेकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन नेते आणि त्यांचे सरकार राज्यातील लोकांसाठी काम करत आहे. प्रश्न आमच्या संतोष-असंतोषाचा नाही आहे. राज्यातील जनतेला विकास आणि प्रगती हवी आहे. आज तसा पूर्ण विश्वास शिंदे व फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारवर जनतेचा आहे. त्यामुळे आम्हाला काय मिळाले आणि आमच्या आमदारांना काय मिळले, हे महत्त्वाचे नाही तर सगळे आमदार समाधानी आहेत. या सरकारच्या माध्यमातून लोकांची कामे होत आहेत. यामुळे शिंदे-फडणवीस सरकार आनंदी आहे. तसेच यापुढे सुद्धा राज्यातील जनतेची आणखी कामे होत राहतील. असा दावा दरेकर यांनी केला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची टीम अत्यंत प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत आहे आणि यापुढेही करत राहणार असल्याचा विश्वास प्रविण दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

Tags:    

Similar News