'दुसऱ्या कुणाच्या संपत्तीवर टाच आणून त्याला अजित पवारांचे नाव द्यायचे' ; मंत्री नवाब मलिक यांची टीका

Update: 2021-11-02 10:54 GMT

मुंबई :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आयकर विभागानं मोठी कारवाई केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकार तसेच भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करुन राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यांच्या प्रयत्नाला राज्य सरकार न घाबरता लढा देणार आहे असं मलिक यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त करण्यात आल्याचे बोललं जात आहे. मात्र , यात तथ्य नसल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. कोणतीही संपत्ती ही बेनामी नसते. त्याचा कुणीतरी मालक असतोच. त्यामुळे दुसऱ्या कुणाच्या संपत्तीवर टाच आणून त्याला अजित पवारांचे नाव देणे योग्य नाही असं मलिक म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजपच्या नेत्यांची त्यांच्या नोकरांच्या, केंद्रीय मंत्र्यांच्या किचन कूकच्या नावे संपत्ती असल्याचेही समोर येऊ शकते. पण, अशा प्रकरणातून केवळ बदनामी होते. छगन भुजबळ यांच्याबाबतीत देखील असेच झाले होते. महाराष्ट्र सदनात घोटाळा झाल्याचा आरोप झाले, त्यावर कोर्टाने सुनावणी घेतली , त्यात भुजबळ निर्दोष असल्याचे समोर आले. केवळ घाबरवण्याचे आणि धमकावण्याचे हे खेळ सुरु आहे, यातून आम्ही घाबरुन जाणार नाही, असं मलिक म्हणाले.

Tags:    

Similar News