बूँद से गयी वो हौद से नहीं आती, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्रानंतर जनतेच्या प्रतिक्रीया

आपल्या विविध भूमिकांमुळे वादग्रस्त ठरलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्तीसाठी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठविले आहे. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पदमुक्तीच्या पत्रानंतर राज्यातील जनतेला नेमकं काय वाटतंय? ते जाणून घेणारा मॅक्स महाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट....

Update: 2023-01-24 09:10 GMT

महापुरुषांचा अवमान, 12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्त्या, पहाटेचा शपथविधी, कोरोना काळात धार्मिक स्थळं उघडण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लिहीलेले पत्र यावरून भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांची राज्यपाल पदाची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. त्यातच आता भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्याला पदमुक्त करावं, अशी मागणी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्याकडे पत्र लिहून केली आहे. पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतरही राज्यातील जनतेने भगतसिंह कोश्यारी यांनी निघून जावे, अशी प्रतिक्रीया दिली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहीले आहे. त्याबाबत सोलापूर जिल्ह्यातील नागरिक म्हणतात की, "जो बूँद से गयी, वो हौद से नहीं आती." भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांबाबत जी वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या चांगल्या कामाला धक्का बसला. राम मंदिर, कलम 370 हटवणे यासारखी जी कामं झाली, ती या वाचाळ माणसामुळे दुर्लक्षिली गेली, अशी प्रतिक्रीया दिली.

राजू गुंड यांनी सांगितले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. महापुरुषांचा अवमान केला. त्यामुळे त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी राजीनामा द्यायलाच हवा, असं सांगितले.

आणखी एका व्यक्तीशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, मी राज्यपाल पदाचा निश्चित आदर करतो. पण भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल पदावर राहण्याच्या लायकीचे नाहीत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर निघून गेलं पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली.

भगतसिंह कोश्यारी हे भारतीय राजकारणातील अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुध्दीमत्तेचे व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाते. ते उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री होते. मात्र दुर्दैवाने महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी केलेली वादग्रस्त विधानं ही चिंता वाढवणारे होते. कारण यामागे संघाने जाणीवपुर्वक कोश्यारींच्या माध्यमातून खोटं बोलून ते भविष्यात खरं गणलं जाईल, अशी पेरणी केल्याची शक्यता बीडमधील नागरिकांनी व्यक्त केली. तसेच कोश्यारी यांचा राजीनामा नाही तर हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली.

भगतसिंह कोश्यारी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (savitribai Phule) यांच्याबाबत केलेलं वक्तव्य अत्यंत चीड आणणारे होते. त्यामुळे त्यांच्यासारख्या व्यक्तीला महाराष्ट्रात राहण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे पुण्यातील विद्यार्थ्यांनी सांगितले.

भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त करण्याबाबत पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहीले. यामागे एक कारण हे आहे की, आगामी काळात मुंबई (Mumbai) महापालिका (BMC election) निवडणूक होणार आहे. त्यापार्श्वभुमीवर भाजपने भगतसिंह कोश्यारी यांच्याविषयी नागरिकांमध्ये असलेल्या नाराजीचा भाजपला फटका बसू नये, यासाठी भाजपने खेळलेली खेळी असल्याचे राजू वाघमारे यांनी सांगितले.

यावरून राज्यातील जनतेमध्ये भगतसिंह कोश्यारी यांच्याविषयी किती नाराजीचा सूर आहे, हे दिसून येते. त्यामुळे भाजपने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे. ( Bhagat Singh koshyari resignation)

Tags:    

Similar News