"तुमचा हेतू शुद्ध असेल तर..." प्रियंका गांधी यांचे पंतप्रधान मोदींना आवाहन

Update: 2021-11-20 07:36 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. यानंतर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदींनी हा निर्णय घेतल्याची टीका होते आहे. दरम्यान या मोठ्या निर्णयानंतर पंतप्रधान मोदी शनिवारी लखनऊमध्ये येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना आवाहन केले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यासोबत व्यासपीठावर न बसण्याचे आवाहन केले आहे.

अन्यायकारक कृषी कायदे आपण मागे घेतले आहेत, पण आपला हेतू शेतकऱ्यांबद्दल शुद्ध असेल तर लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या आरोपीच्या वडिलांसोबत आपण व्यासपीठावर एकत्र बसू नये, असे आवाहन प्रियंका गांधी यांनी केले आहे. अन्यायकारक केंद्रीय कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनात ७०० शेतकरी शहीद झाले आहेत. तसेच लखीमपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अजय मिश्रा यांच्या मुलाने चिरडले होते, त्यामुळे एका आरोपी मुलाच्या वडिलांसोबत आपण व्यासपीठावर बसू नये, आणि अजय मिश्रा यांना राजीनामा घ्यावा असे आवाहन प्रियंका गांधी यांनी केले आहे. लखनऊमध्ये शनिवारी डीजीपींची एक मोठी कॉम्फरन्स होणार आहे. या कॉन्फरन्समध्ये पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री म्हणून अजय मिश्रा देखील सहभागी होणार आहेत.

लखीमपूर खेरीमधील घटनेच्या चौकशीवरुन सर्वोच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त करत एका व्हीआयपी आरोपीला फायदा होईल अशा पद्धतीने तपास सुरू असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्या गाडीने आंदोलन करणाऱ्या काही शेतकऱ्यांना चिरडले होते.

Tags:    

Similar News