भाजपाने ओबीसी समाजाला फसवण्याचा प्रयत्न करू नये'- सानप

ओबीसींचे आरक्षण केंद्र सरकारने नाकारले तर दुसरीकडे मात्र भाजप राज्यामध्ये रस्त्यावर उतरत आहे. त्यामुळे भाजपाने ओबीसी समाजाला फसवण्याचा प्रयत्न करू नये असं म्हणतं बाळासाहेब सानप यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

Update: 2021-07-24 08:15 GMT

 केंद्र सरकारने ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेला स्पष्ट नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचे राजकीय आरक्षण स्थगित केले आहे, यामुळे ओबीसींचे राजकीय प्रतिनिधीत्व संपुष्टात आले. तसेच वैद्यकीय प्रवेशाचा कोटाही स्थगित करण्यात आला. ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षण रद्द झाल्यामुळे राज्यातील सर्वच जिल्हा परिषद, नगरपालिका, मनपा यातील 56 हजार लोकप्रतिनिधींना याचा फटका बसला. त्यामुळे भाजपाने ओबीसी समाजाला फसवण्याचा प्रयत्न करू नये असं म्हणत ओबीसी, व्ही.जे.एन.टी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते नांदेड येथील समाजचिंतन मेळाव्यात बोलत होते.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत सर्वच राजकीय पक्ष आंदोलनात उतरले. मात्र, आरक्षण पुनर्स्थापन करण्यासाठी, पुढील दिशा ठरविण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन विचार करणे गरजेचे आहे. असं सानप यांनी म्हटले आहे. ओबीसीच्या शैक्षणिक, सामाजिक मागण्यांसह नोकरभरतीतील अनुशेष, पदोन्नतीतील आरक्षण यासारख्या विविध विषयांवर विचारमंथन करण्यासाठी या समाजचिंतन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान यावेळी पत्रकारांशी बोलताना बाळासाहेब सानप म्हणाले की, ओबीसींचे आरक्षण केंद्र सरकारने नाकारले तर दुसरीकडे मात्र भाजप राज्यामध्ये रस्त्यावर उतरत आहे. पण आता ओबीसी समाज हा जागा झाला आहे त्यामुळे भाजपाने ओबीसी समाजाला फसवण्याचा प्रयत्न करू नये असं सानप यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News