राज्यात भाजप हिंदू आणि मुस्लिम वाद निर्माण करत आहे- नाना पटोले

Update: 2021-11-22 02:57 GMT

मुंबई : भाजपकडून राज्यात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करण्याचे काम सुरू असून याचा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते बदलापुरात काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते.

अमरावतीत जो काही प्रकार घडला, त्यात भाजपचे माजी मंत्री आणि 25-26 कार्यकर्ते वाद निर्माण करताना सापडले. मात्र, आम्ही जनतेला शांत राहण्याचं आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र शांत झाला, असं पटोले म्हणाले.

राज्यातील वातावरण भाजपकडून गढूळ केलं जातंय असं म्हणत पटोले यांनी एसटी कामगारांच्या आंदोलनावरूनही भाजपवर निशाणा साधला. एसटी कामगारांच्या आंदोलनामागे भाजप आहे, हे आता उघड झालं आहे. एसटी कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्यातलं वातावरण गढूळ केलं जात आहे. राज्य सरकार हे एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून हा प्रश्न एका दिवसात सुटणारा नाही. मात्र, एसटी कामगारांना न्याय नक्की मिळेल, त्यांनी आंदोलन मागे घ्यावं. कारण संपामुळे त्यांचं नुकसान होईल, असं आवाहन पटोले यांनी केलं.

दरम्यान, बदलापुरात काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी संजय जाधव यांची नव्यानेच नियुक्ती करण्यात आली. जाधव यांनी उभारलेल्या काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचं नाना पटोले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.

Tags:    

Similar News