शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्य...

Update: 2023-01-24 09:38 GMT

राज्यात गेल्या पाच महिन्यापूर्वी सत्तेवर आरुढ झालेले शिंदे-फडणवीस सरकार हे घटनाबाह्य असल्याचा आरोप नवी मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष जाधव यांनी केला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापनेसाठी दिलेल्या पत्रांची कोणतीही नोंद राज्यपाल कार्यालयाकडे नसल्याचे स्पष्टीकरण राजभवनाने माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या अर्जाला दिले

आहे. नवी मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष जाधव यांनी केलेल्या अपिलावर घेतलेल्या सुनावणीनंतर राजभवनाने हे स्पष्टीकरण दिले आहे. जाधव यांनी यासंदर्भात ८ ऑक्टोबर २०२२ रोजी मागविलेल्या माहितीवर राजभवनाने त्यांना सत्तास्थापनेसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना दिलेल्या पत्राची छायांकित प्रत दिली होती. मात्र, आपणास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापनेसाठी दिलेल्या पत्रांची छायांकित प्रत मिळावी, असे अपिल जाधव यांनी केले होते.

दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी दिलेल्या पत्रांची कोणतीही नोंद राज्यपालांकडे नसल्याचे स्पष्टीकरण राजभवनाने माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या अर्जाला दिले आहे. राजभवनाच्या या स्पष्टीकरणानंतर विधीमंडळ सचिवालयाने कोणत्या पत्रान्वये आणि कोणत्या अधिकारात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पाडला, असा प्रश्न उपस्थित करत हे सरकार घटनाबाह्य असल्याची प्रतिक्रिया माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष जाधव यांनी दिली आहे. 

Tags:    

Similar News