Women in Politics : पुरुषोत्तर राजकारणात उभ्या राहिलेल्या स्त्रिया !

सुनेत्रा पवारांचा अनुभव काय? त्यांना राजकारण जमेल का ? झेपेल का ? वगैरे प्रश्नं उपस्थित केले जातायत. इंदिरा गांधींनाही सुरवातीला ‘गूँगी गुडिया’ म्हणून हिणवलं गेलं होतं. सुनेत्रा पवारांची आत्ताशी सुरवात आहे. पतीच्या मृत्यूनंतर चौथ्याच दिवशी शपथविधीसाठी बाहेर पडून त्यांनी स्त्रीच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा अडथळा पार केलाय. अहिल्याबाई होळकर ते सुनेत्रा पवार... राजकारणातील स्त्रियासंदर्भात कॅप्टन स्मिता गायकवाड यांचा लेख

Update: 2026-02-02 14:40 GMT

Women empowerment through politics (सुनेत्रा पवारांच्या शपथविधीच्या निमित्ताने)

“I did not choose this struggle. It was thrust upon me by circumstances. My political life began when my father was taken away from me” (मी हा संघर्ष निवडला नाही. तो माझ्यावर नियतीने थोपवला. ज्या दिवशी माझे वडिल माझ्यापासून हिरावले त्या दिवशी माझ्या राजकीय जीवनाचा प्रवास सुरु झाला” बेनेझीर भुट्टोंच्या “ Daughter of destiny” ह्या आत्मचरित्रातलं हे वाक्यं. १९७७ मध्ये जनरल झिया उल् हक ह्यांनी सैनिकी उठाव करत झुल्फिकार अलि बुट्टोंची सत्ता उलथवली आणि १९७९ मध्ये त्यांना मृत्युदंड देण्यात आला. १९७७ ते १९८४ बेनिझिर बुट्टोंना house arrest मध्ये ठेवण्यात आलं. दोन वर्ष exile मध्ये राहून १९८६ मध्ये त्या परत आल्या आणि त्यांनी PPP ह्या राजकीय पक्षाची सूत्रं हाताी घेतली. १९८८ मध्ये पाकिस्तानच्या राष्ट्रीय निवडणुकांच्या प्रचारावेळी त्या गरोदर होत्या. “गरोदर बाई प्रचारसभा काय घेणार?”पासून “ प्रसूतीच्या वेळी जर काही झालं तर राष्ट्रीय संकट निर्माण होईल.” अशा शंका विरोधकांनी आणि त्यांच्याच पक्षातल्या झारीतल्या शुक्राचार्यांनी प्रचारादरम्यान उपस्थित केल्या. बाई इतकी खमकी होती की तिनं विरोधकांच्या राजकीय खेळीची गणितं लक्षात घेऊन डॅाक्टरांच्या सल्ल्याने caesarean delivery करुन घेतली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रचाराला उतरली. « I did not want to encourage the idea that pregnancy interferes with performance. Timing of the caesarean wasn’t just about health. It was political. » (गरोदर असणं कर्तव्याच्या /कर्तृत्वाच्या आड येतं ह्या कल्पनेला मला भीक घालायची नव्हती. सिझेरियन करण्याची वेळ फक्तं तब्येतीचा विचार करुन नव्हती. तर राजकीय होती.) मुस्लीम राष्ट्राच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा मान त्यांना मिळाला.




“After my father was killed, I had only one goal - to serve the people of Bangladesh and fulfil his unfinished work.” (माझ्या वडिलांच्या हत्येनंतर बांग्लादेशाच्या जनतेची सेवा करणं आणि वडिलांचं अपूर्ण काम पूर्ण करणं हे माझं एकमेव ध्येयं होतं). १९९० मध्ये शेख हसीनांनी एका रॅलीमध्ये व्यक्तं केलेल्या ह्या भावना. १९७५ मध्ये शेख मुजीबूर रेहेमान आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या करण्यात आली. शेख हसीना त्यावेळी परदेशात असल्याने वाचल्या. १९८१ पर्यंत त्यासुद्धा exile मध्ये होत्या. १९८१ मध्ये बांग्लादेशी परतून त्यांनी आवामी लीगचं नेतृत्व केलं.




ह्याच बांग्लादेशच्या खालिदा झिया म्हणतात - « I never imagined myself in politics. After my husband’s death , I had no other path left » ( मी स्वतः राजकारणात असण्याची कधीच कल्पना केली नव्हती परंतु माझ्या पतीच्या मृत्युनंतर माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.) १९८१ मध्ये बांग्लादेशात सैनिकी उठाव झाला आणि खालिदांच्या पतीची हत्या झाली. त्या घटनेनंतर त्यांनी BNP (बांग्लादेश नॅशनल पार्टीची) सूत्रं हाती घेतली.


१९९१ मध्ये बांग्लादेशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री झाल्या आणि मुस्लिम राष्ट्राच्या दुसऱ्या. पहिल्या पाकिस्तानच्या बेनेझीर भुट्टो होत्या. ह्या दोन स्त्रियांनी पुढे अनेक दशकं बांग्लादेशाचं राजकारण चालवलं ज्याचं वर्णन “Battle of begums” म्हणून केलं गेलं.

« I accepted leadership not out of desire, but to honour the trust placed in my husband » (मी माझ्या इच्छेसाठी नव्हे तर लोकांनी माझ्या पतिवर ठेवलेल्या विश्वासासाठी नेतृत्व स्विकारलं) श्रीलंकेच्या राजकीय नेत्या सिरीमावो बंदारनायके ह्याचं १९६० मधल्या एका भाषणातलं हे वाक्यं. १९५९ मध्ये त्यांच्या पतीची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. पुढची ३४ वर्ष श्रीलंका फ्रीडम पार्टी (SLFP) चं नेतृत्वं त्यांनी केलं आणि जेव्हा एखाद्या स्त्रीनं एखाद्या देशाचं नेतृत्वं करणं ही कल्पनाही लोक करु शकत नव्हते अशावेळी त्यांनी १९६० ते ६५ ह्याकाळात श्रीलंकेचं पंतप्रधानपद सांभाळलं. पुढे १९७० ते ७७ आणि १९९४ ते २००० ह्या काळातही त्या श्रीलंकेच्या पंतप्रधान होत्या.



 « I did not set out to become a politician. I could not , as my father’s daughter, remain indifferent to my people’s struggle »म्यानमारच्या नेत्या ॲांग सान सू क्यी ह्यांचं १९८८ च्या लोकशाहीच्या समर्थनार्थ झालेल्या निदर्शनांमधलं हे वाक्यं. १९४७ मध्येच त्यांच्या वडिलांची हत्या झाली होती. १९८८ मध्ये आजारी आईच्या देखभालीसाठी त्या मायदेशी परतल्या आणि लोकशाहीसाठीच्या संघर्षात सहभागी झाल्या. त्यानंतर आयुष्याची अनेक दशकं त्यांनी house arrest मध्ये काढली.


कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या मृत्यूमुळे आणि परिणामी देशावर/साम्राज्यावर/पक्षावर आलेल्या संकटकाळात धीरोदात्तपणे उभ्या राहिलेल्या महिलांची भारतातही अनेक उदाहरणं आहेत. भारताच्या इतिहासात अहिल्यादेवी, राणी लक्ष्मीबाई, राणी ताराबाई ह्यांची उदाहरणं आहेत. इंदौरला आणि माहेश्वरला गेल्यावर अहिल्यादेवींचा इतिहास ऐकताना आणि पाहताना अभिमानानं ऊर भरुन येतं. त्या काळात २८ वर्ष यशस्वी राजकारण आणि समाजकारण करणं सोपी गोष्टं नाही. अहिल्यादेवींनी जे केलंय ते अचंबित करणारं आहे.


त्याशिवाय, भारताच्या स्वातंत्र्योत्तर राजकारणात इंदिरा गांधी, सोनिया गांधी अशी उदाहरणं देता येतील. ज्यांच्याकडे परिस्थितीमुळे पक्षाचं नेतृत्वं आलं आणि त्या जबाबदारीला त्यांनी न्याय दिला.



आज ह्या यादीत अजून एक नाव जोडलं गेलंय - सुनेत्रा अजित पवार. त्यांच्यावर नियतीने टाकलेल्या ह्या जबाबदारीला त्या कितपत न्याय देऊ शकतात हे येणारा काळ ठरवेल. परंतु पतीच्या निधनाच्या चौथ्याच दिवशी, राजकीय स्वार्थानी ग्रस्तं लोकांची कटकारस्थानं चालू झाली असताना, नवऱ्याचा राजकीय वारसा वाचवण्यासाठी आणि जपण्यासाठी वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून त्यांनी जी कर्तव्यतत्परता दाखवली आहे त्याला धैर्य लागतं. त्या धैर्यासाठी निश्चितच मानलं त्यांना. भल्याभल्यांना न जमणारं आहे हे.


२०१९ मध्ये एबीपी माझा नी “पवारांच्या लेकी सुना“ ह्या शीर्षकाखाली सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार ह्यांची एकत्रित मुलाखत घेतली होती. त्यात दोन प्रश्नं होते ज्यांची सुनेत्रा पवारांनी दिलेली उत्तरं interesting होती. “मुख्यमंत्र्यांची पत्नी, की आमदाराची आई की स्वतः आमदार ह्या तिन्हीपैकी काय जास्तं आवडेल ?“ त्यावर त्यांनी ह्यापैकी काहीही असं फारच general, politically correct उत्तर दिलं होतं. सुनेत्रा पवारांना वैयक्तिक political ambition आहे का? हा प्रश्नं मला तेव्हा पडला होता. “आमच्या वहिनी दादापेक्षा जास्तं घट्टं मनाच्या आहेत. दादा हळवा आहे.” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्याचा प्रत्यय गेल्या चार दिवसात आला.

भाजपाची भाट मंडळी सवयीप्रमाणे त्यांच्या पक्षाच्या सोयीच्या निर्णयांना राष्ट्रहित, समाजहित म्हणत रंगरंगोटी करायला सरसावली आहे. पवार कुंटुंबावर परिवारवादाचे आरोप करणारे भाजपाचे भाट त्याच परिवारवादाच्या औचित्यावर लेखण्या झिजवत आहेत. ही भाट मंडळी जेव्हा लोकसभेला “राष्ट्रवादीला(अजित पवार गट) मतदान करा” म्हणून पोस्टी लिहीत होती तेव्हा कोणीतरी त्यांना ‘सामना’ चित्रपटातल्या मास्तरची उपमा देत लिहिलं होतं - “ज्यांना गावाबाहेर काढायला निघाले होते त्यांच्याच स्टेजवर तुणतुणं घेऊन उभं राहायची वेळ आली.” सोयीनुसार भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि सोयीनुसार पुसायचे हा भाजपाचा खेळ महाराष्ट्राची जनता पाहत आहे. ह्या भाट मंडळींना आज अहिल्यादेवींची आठवण झाली म्हणून त्यांचंच उदाहरण मी इथे देऊ इच्छिते. अहिल्यादेवींनी पतीच्या मृत्युनंतर राज्यकारभार हातात घेतलाच होता. पण त्याचबरोबर राघोबा पेशव्यांनी त्यांच्या राज्यावर स्वारी करण्याचा विचार केल्यावर त्यांच्याशी न लढताच त्यांना नामोहरम पण केलं होतं. पक्षांतर्गत शत्रूंना ओळखणाऱ्या सुनेत्रा पवार पक्षाबाहेरील शत्रूंना आणि ज्यांनी त्यांच्या पतिविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करत रान पेटवलं आणि राजीनामा द्यायला भाग पाडलं त्यांना ओळखून नसतील काय? एकंदर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याच्या शक्यतेचा भाजपानी फारच धसका घेतलेला दिसतोय.

पुरुषप्रधान जगात स्त्रियांना नेतृत्वाच्या संधी सगळे पुरुषांचे पर्याय संपल्यावर मिळत आल्या आहेत आणि त्यातही स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वानं त्या संधींचं सोनं केलं आहे हे वरील सर्व उदाहरणांवरुन आपल्याला पहायला मिळतं. शरद पवार, कांशीराम ही निवडक उदाहरणं वगळता पक्षाच्या धुरा पुरुष नेतृत्वाकडे सोपवण्याचाच एकंदर कल दिसतो. शरद पवारांना सुप्रिया सुळे ह्या मुलीऐवजी सलग चार वेळा लोकसभेत निवडून येणारा मुलगा असता तर त्याचंही नेतृत्वं अजित पवार किंवा त्यांच्याबरोबर गेलेल्या कार्यकर्त्यांनी नाकारलं असतं का ? हा प्रश्नं मला अजित पवारांचा गट वेगळा झाला तेव्हा पडला होता. महाराष्ट्रातल्या अजून एका पुरोगामी पक्षाची धुरा स्त्री नेतृत्वाकडे जाणं हा नियतीचा निर्णय आहे. ज्या परिस्थितीत तो झालाय ते वाईट आहे. तरीही! बाकी, राजकीय क्षेत्रात इंदिरा गांधी, सोनिया गांधी, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, ममता बॅनर्जी, मायावती इत्यादी विविध पक्षांच्या अध्यक्ष स्त्रिया झाल्या. भारतातील हिंदुत्ववादी पक्षांना अध्यक्ष म्हणून स्त्री नेतृत्वं स्विकारायला किती दशकं जावी लागतील?

सुनेत्रा पवारांचा अनुभव काय? त्यांना राजकारण जमेल का ? झेपेल का ? वगैरे प्रश्नं उपस्थित केले जातायत. इंदिरा गांधींनाही सुरवातीला ‘गूँगी गुडिया’ म्हणून हिणवलं गेलं होतं. त्या गूँगी गुड़ियानी नंतर अमेरिकेला सुद्धा त्यांची जागा दाखवून दिली आणि पाकिस्तानचे दोन तुकडेही केले. सुनेत्रा पवारांची आत्ताशी सुरवात आहे. पतीच्या मृत्यूनंतर चौथ्याच दिवशी शपथविधीसाठी बाहेर पडून त्यांनी स्त्रीच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा अडथळा पार केलाय. “लोक काय म्हणतील?” ,” नातवाईक काय म्हणतील ?” आणि ‘परंपरांची भीती’ ह्या विचारांच्या ओझ्यातून त्यांनी स्वतःला मुक्तं केलंय. ह्या अडथळ्यांवर एकदा मात केली की स्त्रीचा पुढचा प्रवास सोपा होतो. जेव्हा स्त्री स्वतःवर विश्वास ठेवते तेव्हा समाजाच्या चौकटी आपोआप रुंदावतात. परंपरांचा सन्मान राखत परंतु त्यामुळे थांबून न राहता पुढे जाणे हे सामर्थ्याचेच रुप आहे. अशा क्षणांपासून नव्या वाटा खुल्या होतात. एक राजकारणी म्हणून सुनेत्रा पवार यशस्वी होतात की अयशस्वी हे येणारा काळ आणि त्यांचे निर्णय ठरवतील. परंतु शिव- शाहू- फुले- आंबेडकरांच्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांच्या प्रेरणेनं एक स्त्री अत्यंत बिकट परिस्थितीत राजकारणात धैर्यानं उभी राहते ह्याचं कौतुक निश्चितच व्हायला हवं.

कॅप्टन स्मिता गायकवाड

Similar News